मुंबई-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर 'फास्टॅग'चा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:44 IST2019-12-17T12:32:38+5:302019-12-17T12:44:58+5:30
मुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी, पडघा टोलनाक्यावर शनिवारी ( ता. १५ ) मध्यरात्री नंतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर 'फास्टॅग'चा बळी
- शाम धुमाळ
कसारा- मुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी, पडघा टोलनाक्यावर शनिवारी ( ता. १५ ) मध्यरात्री नंतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच अधिकच्या विलंबाने नाशिक मार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या एका प्रवाशास शनिवारी दुपारी १ वाजताच्यादरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने आपला प्राण गमवावा लागला. मनोहर भिसे (वय 51 रा. चेंबूर,मुंबई ) असे प्रवाशाचे नाव असून, यावेळी टोल प्रशासनाची रुग्ण वाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. दरम्यान मध्यरात्रीपासून पोलिसांचा खडा पहारा दोन्ही टोलनाक्यावर लावण्यात आला होता.
अधिकच्या वेळेमुळे व नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक वेळा वाहन चालक व टोल प्रशासन यांच्यात वाद व हमरीतुमरी झाली, तेव्हा पोलिसांच्या मध्यस्तीनं वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. दरम्यान टोल कंपनीचे कामगार असलेल्या पडघा टोलवरील कर्मचारी प्रवासी व वाहन चालक याच्याशी कायम दादागिरीचे वर्तन करीत असल्याने एक दिवस या पडघा टोलनाक्यावर कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन सुरू असल्याने दोन्ही बाजूला १ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे 3 दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. ‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच वाहानांनी टोलनाक्यावर फास्टॅगद्वारेच ऑनलाइन आपला टोल भरणे अपेक्षित आहे.