प्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री, पर्यावरणप्रेमी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:21 IST2018-09-22T03:21:42+5:302018-09-22T03:21:45+5:30

एकीकडे प्लास्टिक पिशवीबंदी लागू केल्यानंतर दुसरीकडे किराणा मालासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी राज्य सरकारने उठवली.

 Faster sales of plastic bags, ecstatic angry | प्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री, पर्यावरणप्रेमी नाराज

प्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री, पर्यावरणप्रेमी नाराज

कल्याण : एकीकडे प्लास्टिक पिशवीबंदी लागू केल्यानंतर दुसरीकडे किराणा मालासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी राज्य सरकारने उठवली. त्यामुळे एकूणच प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीविरोधात सुरू असलेली कारवाई थंडावली आहे. सध्याच्या सणासुदीच्या दिवसांत प्लास्टिक पिशव्यांच्या कारवाईकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने कल्याण-डोंबिवलीत प्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री सुरू आहे.
राज्यात २३ जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत केडीएमसी प्रशासनाने प्लास्टिक संकलन केंद्रे उघडली. तसेच प्लास्टिक बाळगणाºया व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यासाठी पर्यावरणप्रेमी, स्वच्छतादूत यांचे महापालिकेला सहकार्य मिळत होते. परंतु, प्लास्टिक कारवाईसंदर्भात व्यापाºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे राज्य सरकारने बंदीमध्ये शिथिलता आणून किराणा माल प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळेल, असे जाहीर केले. त्यानंतर, मात्र प्लास्टिकविरोधी कारवाई थंडावली.
पर्यावरणप्रेमी विजय भोसले यांनी माहितीच्या अधिकारात पर्यावरण मंत्रालयाकडून मागितलेल्या तपशिलात, ग्राहकाला दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी विघटन प्रक्रिया संबंधित विक्रेत्यानेच करायची असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र महापालिकेकडे प्लास्टिक पिशव्यांच्या विघटनाची व विल्हेवाटीची कोणतीही यंत्रणा नाही. मग, ती विक्रेत्यांकडे कुठून येणार, असा सवाल भोसले यांनी केला आहे. प्लास्टिक पिशव्याबंदीचा निर्णय लादल्यानंतर दंडात्मक कारवाईच्या निमित्ताने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु, किराणा मालासाठी प्लास्टिक पिशव्या वापरण्याची मुभा दिल्याने प्लास्टिकबंदीचा मूळ हेतूच बाजूला पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर तत्कालीन राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी घातली होती. त्यावेळी जर ठोस कारवाई झाली असती, तर पुन्हा बंदीचा निर्णय लादावा लागला नसता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. एकदा बंदी लागू झाल्यानंतर बंदीमध्ये शिथिलता आणण्यामागे सरकारचा हेतू संशयास्पद आहे. ही एक प्रकारे फसवणूकच आहे, असा आरोप भोसले यांनी केला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्यास मुभा आहे. परंतु, अशा पिशव्यांचे विघटन होते का, असा सवालही त्यांनी केला आहे.
दुकानांसह फेरीवाले, भाजीविक्रेते, हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणारे, कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुल बाजार येथे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. सध्या सणांच्या काळात कारवाईकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. दररोज निर्माण होणाºया कचºयात आढळून येणाºया प्लास्टिक पिशव्यांचा खच पाहता कारवाई पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट होत आहे.
>ग्राहकांनीच कराव्यात नष्ट
पॅकेजिंग मटेरियल उत्पादन करणारे उद्योग व अशा उत्पादक उद्योगांच्या संघटना व किरकोळ विक्रेते संघटना यांनी संयुक्तपणे ग्राहकाने वापरलेले प्लास्टिक पुनर्खरेदीद्वारे गोळा करण्याबाबत व्यवस्था निर्माण करणे व त्यांची विल्हेवाट लावणे बंधकारक असताना कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडित यांनी मात्र प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट ग्राहकानेच लावायची असल्याचे मत ‘लोकमत’कडे व्यक्त केले. प्लास्टिकच्या पिशवीतून माल ग्राहक नेतो. त्यामुळे त्यानेच पिशवीची विल्हेवाट लावायची आहे,
असे पंडित यांनी सांगितले.
प्रतिसाद नाही : केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title:  Faster sales of plastic bags, ecstatic angry