संपणार कधी या भग्न शिल्प अन शिलालेखांचा वनवास ?

By Admin | Updated: June 21, 2016 00:50 IST2016-06-21T00:50:25+5:302016-06-21T00:50:25+5:30

वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती.

Ever ending the fossil craft and inscriptions? | संपणार कधी या भग्न शिल्प अन शिलालेखांचा वनवास ?

संपणार कधी या भग्न शिल्प अन शिलालेखांचा वनवास ?

विरार : वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती. वसईत आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे जागोजागी उभ्या आहेत. रामायण, महाभारत, बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र ,शतकर्णी, शिलाहार, राजा बिम्बदेव, मुघल व पोर्तुगीज ह्या काळात व राजविटमध्ये येथे अनेक शिल्पस्थापत्य कला उदयास आल्या. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य याबरोबरच ज्ञान-विज्ञानाच्या निर्मितीचा कळसही या प्रदेशाने अनुभवला आहे.
वसईत ठिकठिकाणी खोदकाम करताना किंवा तलावांतून मिळालेली शिल्प वा शिलालेख इतिहासाची साक्ष देणारी आहेत. पूर्वी हाच शूर्पारक म्हणून नावलौकीक असलेला परिसर ‘पवित्र तीर्थक्षेत्र’ म्हणून भारतवर्षात प्रसिद्ध होता. या भूमीत असलेल्या १०८ तलाव पवित्र तीर्थ असल्याचे लोक मानत असत. काही तलावांना स्नानासाठी दगडी घाट देखील बांधलेले होते. त्यावर सुंदर अशी शिल्प देखील होती.
नक्षीदार मूर्ती व शिल्पपटांनी संपन्न २०० हून अधिक मंदिरे होती. काळाच्या ओघात व परकीय आक्रमणात यातील बरीच मंदिरे नष्ट झाली. कालांतराने मंदिरांतील भग्न झालेल्या मूर्तींचे विर्सजन तलावांत करण्यात आले होते, नंतरच्या पिढींना तलावात खोदकाम करताना किंवा विहीरींतील गाळ काढताना हा पुरातन ठेवा सापडला गेला. तो पुन्हा बाहेर काढून ठेवण्यात आला. हा बाहेर काढून ठेवलेला अनमोल ठेवा त्यानंतर कायम दुर्लक्षीतच राहिला. आजही अशा कित्येक भग्न मूर्ती/शिल्प व शिलालेख वसई-विरार परीसरात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराच्या बाजुला अडगळीत पडलेला आढळतो. निर्मळ येथील सुळेश्वर मंदिर व सोपारा येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात अशा असंख्य भग्न मूर्त्या व शिलालेख आपल्याला पहायला मिळतील.
वसई-विरार परीसरात असे कुठलेच संग्रहालय सध्या तरी अस्तित्वात नाही. वसईत अनेक ठिकाणी बेवारसपणे पडलेला हा अनमोल ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवावा अशी मागणी आता नागरीकांकडून होत आहे. तलाव सुशोभीकरण, मँरेथॉन स्पर्धा, माहि वसई महोत्सव व वसई विजयोत्सवावर लाखो रूपये खर्च करणाऱ्या महापालिकेने वसईत कायम स्वरूपी संग्रहालय बनवून हा अनमोल असा ऐतिहासीक ठेवा लवकरात लवकर जतन करून ठेवण्यात यावा असे लोकांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)

एके काळी या मूर्ती/शिल्प देवालयाची प्रतिष्ठा होत्या. त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा होत असे. पण आता इतिहासाची साक्ष देणारी ही शिल्प, मूर्ती व शिलालेख सध्या आपले अिस्तत्वच हरवून बसलेली आहेत. मोडी लिपीत कोरलेल्या शिलालेखांचा काही ठिकाणी चक्क कपडे धुण्यासाठी वापर केला जात आहे हे ऐकून विश्वासही बसणार नाही. काल-परवापर्यंत द्रुष्टीस पडणारा हा ऐतिहासिक ठेवा हळूहळू वसईतून गायब होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पुरातन वस्तूंना मागणी असल्यामुळेच गेल्या काही वर्षात हा अनमोल ठेवा चोरला तर जात नाही ना अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.

Web Title: Ever ending the fossil craft and inscriptions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.