घरगुती वादातून जावयाने केली सासूची चाकूने वार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 06:09 IST2024-06-20T06:08:43+5:302024-06-20T06:09:00+5:30
विरारच्या साईनाथ नगर येथील धक्कादायक घटना.

घरगुती वादातून जावयाने केली सासूची चाकूने वार करून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : घरगुती वादातून जावयाने सासुवर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी विरारच्या साईनाथ नगर परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. आरोपी जावयाला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास व चौकशी करत आहे.
साईनाथ नगरच्या जानूवाडी परिसरातील वामन निवासमध्ये लक्ष्मी खांबे (६०) या मुलगी आणि नातवासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी कल्पना (३९) हिचे प्रशांत खैरे (४१) याच्यासोबत २०१२ साली लग्न झाले होते. प्रशांत हा दारू पिऊन पत्नी कल्पनाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्यामुळे कल्पना आई लक्ष्मी आणि दोन मुलांसह तीन महिन्यांपूर्वी वामन निवासमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. प्रशांतला घरी घेत नसल्याने दररोज दारू पिऊन येत आई व लक्ष्मीला शिवीगाळ करायचा. घटनेच्या दिवशी आरोपी जावई प्रशांतने घरी जाऊन मुले असताना सासू लक्ष्मी यांना बेडरूममध्ये नेऊन तोंड, हात, पाय बांधून चाकूने मानेवर, पोटावर, पायावर वार करून हत्या केली आहे. कल्पना हिने विरार पोलीस ठाण्यात आईच्या हत्येप्रकरणी तक्रार देऊन आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.