शाळांच्या गुणवत्ता वाढीमुळे मुख्य सचिवांकडून ठाणे जि.प.च्या सीईओंसह शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 16:34 IST2018-03-18T16:34:45+5:302018-03-18T16:34:45+5:30

शाळांच्या गुणवत्ता वाढीमुळे मुख्य सचिवांकडून ठाणे जि.प.च्या सीईओंसह शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मान
ठाणे : ‘प्रगत महाराष्ट्र’ या धोरणाची ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) शिक्षण विभागाने तीन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी केली. यामुळे जि.प. शाळांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला. या गुणवत्तेची राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दखल घेऊन मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या हस्ते ठाणे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार व शिक्षणाधिकारी मीना यादव यांना शाल - श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविले.
मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रधान सचिव नंद कुमार यांची देखील उपस्थिती असल्याचे सीईओ विवेक भीमनवार यांनी लोकमतला सांगितले. जिल्हातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्य शासन दखल घेत आहे. स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठाणे जि.प.च्या शाळांची पथदर्शी वाटचाल सुरु असल्याचे समाधानही भीमनवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थाच्या प्राचार्या विजया चिंचोळीकर यांचाही यावेळी सन्मान झाला.
राज्यात २०१५ पासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ धोरण आवलंबण्यात येत आहे. यानुसार १०० टक्के मुले शैक्षणिक दृष्ट्याप्रगत होणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक मुलाची भाषा आणि गणित विषयाची अध्ययन स्तर निश्चिती जिल्ह्यात सुरू आहे. भाषा या विषयात जिल्ह्यात ७३.२५ टक्के विद्यार्थी प्रगत ठरले असून गणित विषयात ६३.४५ टक्के विद्यार्थी प्रगत झाले आहेत. अंबरनाथ , भिवंडी , कल्याण , मुरबाड , शहापूर या पाच तालुक्यात एक हजार ३३१ शाळां आहेत. यामधील १०० टक्के मुले प्रगत झाली पाहिजेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अध्ययन स्तर निश्चित करण्याचा पारदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबवला, असे या यशाचे गमक स्पष्ट करताना शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असून बहुतांश शाळांमध्ये ज्ञान रचनावादी शिक्षण सुरू आहे. कृती युक्त शिक्षण पद्धतीने विद्यार्थी शिकत असल्याने गणितीय क्रियेत मुलांची प्रगती होत असल्याचेही त्यांनी नमुद केले.