दिवाळी तुमची-आमची; जागवलेल्या आठवणी तर  नवीन पिढीसाठी कसा आहे सण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:30 PM2019-10-26T23:30:07+5:302019-10-26T23:30:21+5:30

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छांच्या पोस्टवर पोस्ट पडत आहेत. पूर्वी दिवाळीला घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल असे.

Diwali is yours-ours; What are the festivities for a new generation of awakened memories? | दिवाळी तुमची-आमची; जागवलेल्या आठवणी तर  नवीन पिढीसाठी कसा आहे सण?

दिवाळी तुमची-आमची; जागवलेल्या आठवणी तर  नवीन पिढीसाठी कसा आहे सण?

googlenewsNext

अंगणात बच्चेकंपनी किल्ले बनवण्याबरोबरच फटके फोडत असे. मात्र, सध्या धावपळीच्या आयुष्यामुळे दिवाळी साजरी करण्याची पद्धत बदलत आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्या पढीने आपल्या दिवाळीच्या जागवलेल्या आठवणी तर, नवीन पिढीच्या हा सण साजरा करण्याबद्दलच्या कल्पनांचा घेतलेला हा धांडोळा... 
दिवाळीचे ‘ते’ चैतन्य हरवले!
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे आनंद-उत्साह, दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे चैतन्य, अशी कित्येक वाक्ये दिवाळी सण व्यक्त करण्यासाठी कमी असली तरी पूर्वीचे चैतन्य आणि त्यावेळचा उत्साह मात्र आता हरवला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र बाजारपेठा सजल्या असल्या तरी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीची जागा आता आधुनिकीकरणाने घेतली आहे. धावपळीच्या युगात एकीकडे संवाद हरवला असताना दिवाळी सणही आता सोपस्कारापुरताच राहिला आहे. मध्य रेल्वेत ३३ वर्षांच्या सेवेत सुपरवायझर म्हणून कार्यरत राहिलो आणि आता सेवानिवृत्त झाल्यावर डोंबिवलीमध्ये राहत आहे. जुन्या दिवाळीच्या आठवणी आताही प्रत्येक दिवाळीत मनात गर्दी करतात. लहानपणी व तरुणपणी दिवाळीच्या सणात असलेला साधेपणा व गोडवा आता राहिला नाही. नरकचतुर्दशीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पहिल्या अंघोळीसाठी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच घरातील मंडळी जागी व्हायची. अंघोळीकरिता बंबात कोळसे घालून पाणी उकळले जायचे. थंडीमुळे लहान मुले कुडकुडत असायची. त्यावेळी अंगावर गरमागरम पाण्याचे तांबे घेताना खूप बरे वाटायचे. अभ्यंगस्नान झाल्यावर घरातील अंगणात लावलेल्या तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी पायाच्या अंगठ्याने कारंटी फोडली जायची. त्यानंतर घरात एकत्रित फराळाचा आस्वाद घेतला जायचा. मग, बच्चेकंपनी फटाके फोडण्यासाठी घराबाहेर पडायचे, यात मोठी मंडळीही उत्साहाने सहभागी व्हायची. संपूर्ण शहरभर फटाक्यांचा आवाज आणि त्यातून निर्माण होणारा धूर असे चित्र असायचे. दिवाळी सण सुरू होण्यापूर्वीच घराघरांमध्ये कंदील लावले जायचे. कंदील तुळशीचे लग्न होईस्तोवर घरातील बाल्कनी अथवा अंगणात लावलेले असायचे. आता दिवाळीचे चार दिवस सरताच ते खाली उतरवले जातात. त्यावेळी दिवाळीनिमित्त काढल्या जाणाºया रांगोळ्यांची स्पर्धा लागायची. अंगणाचा परिसर शेणाने सारवला जायचा. ज्याठिकाणी रांगोळी काढली जाणार आहे, त्याठिकाणी गेरूने रंगवले जायचे. आता हाताने रांगोळ्या काढण्याची पद्धत लोप पावली असून रेडिमेड स्टिकरने रांगोळ्यांची जागा घेतली आहे. दिवाळीत फराळाला विशेष महत्त्व असते. त्यावेळी फराळांची देवाणघेवाण व्हायची, हे चित्र चाळींमध्ये सुदैवाने आजही आहे. पण, फ्लॅट संस्कृतीमध्ये हे दिसत नाही. दिवाळीच्या १५ दिवस अगोदर फराळाची तयारी सुरू व्हायची. दिवाळीत तो खायला जायचाच, पण नंतरही काही दिवस सकाळचा नाश्ता म्हणून तो खाता यायचा. आमच्याकडे फराळ घरातच बनविण्याची परंपरा आजही कायम असली तरी बहुतांश ठिकाणी फराळ रेडिमेड आणण्याला प्राधान्य दिले जातेय. आता ऋतुमानातही मोठा फरक पडला आहे. पूर्वी दिवाळीच्या वेळी थंडी असायची. पहाटेच्या वेळी उटणे लावल्यावर अंगात हुडहुडी भरायची, कधी अंघोळीला जातो आणि गरम पाणी अंगावर घेतो, असे व्हायचे पण आता तशी थंडी पडत नाही. आता तर पाऊसही पडतोय. धावपळीच्या युगात दिवाळी साजरा करण्याची पद्धत बदलली असली, तरी भाऊबीजेला बहिणीकडे जाऊन ओवाळून घेण्याची प्रथा कायम राहिली आहे, हीच एक समाधानाची बाब आहे. - गोपाळराव राणे

(लेखक ९३ वर्षांचे आजोबा आहेत)

फटाके, किल्ले लुप्त होताहेत त्याचे वाईट वाटते
दिवाळीतील परंपरा कायम राखण्यावर आम्ही तरुण पिढीचा भर असतो. मात्र, उच्चशिक्षण घेत असताना अनेकदा लेक्चर्स, प्रोजेक्ट यामुळे आधुनिक काळातही पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात. जीवन दिवसेंदिवस कमालीचे व्यस्त होत चालले आहे. आजघडीला प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत आहे. त्यामुळे कुठेतरी सण-उत्सवांचा विसर पडतोय, हे नक्की. आमच्या घरात आजोबांपासून चालत आलेल्या पूर्वापार परंपरेनुसारच सण साजरे केले जातात. दिवाळी सणाचे मला खूप आकर्षण आहे. चार दिवस सर्वत्र रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी हे चित्र पाहून मनाला समाधान मिळते. आता फटाके वाजवण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. आमच्या लहानपणी फटाक्यांच्या आवाजांनी जाग यायची. आता हा आवाज लुप्त झाल्याने दिवाळी पहाटेला सकाळी ७ वाजेपर्यंत डाराडूर झोप लागेल, अशी शांतता असते. आजघडीला आॅनलाइन शॉपिंग, चिनी वस्तूंची होत असलेली खरेदी पाहता वाईट वाटते. फिरून खरेदी करण्यात वेगळीच गंमत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन आपण गप्प बसतो. एकेकाळी प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून शुभेच्छा दिल्या जात होत्या. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या जातात. आम्ही लहानपणी दिवाळीचे किल्ले करायचो. हे चित्र आता फारसे दिसत नाही. बदलत्या काळानुसार चालले पाहिजे. पण, आपले सण, उत्सव साजरे करण्याच्या काही उत्तम परंपरा असतील, तर त्या विसरून चालणार नाही. - तन्वी राणे 
(लेखिका शिक्षण घेणारी नात आहे) - शब्दांकन : प्रशांत माने

दोन रुपये भाऊबीज आणि एका ताग्यातील कपड्यांची मजा गेली
आम्ही ठाण्यात तलावपाळीसमोरच्या परिसरात १९२४ सालापासून राहतो आहे. त्यावेळी दिवाळीत जयंतीला ठाणावाला यांच्या चाळीतले वातावरण खूप चांगले होते. घरी बांबूच्या चौकड्याचे आकाशकंदील बनवले जात. सर्व नातेवाईक घरी जमत. शेव, चकल्या, चिवडा, अनारसे सगळे पदार्थ घरी बनवत. सगळे एकमेकांच्या घरी फराळाला जात असत. तेथेच ठाणावाला यांचा मोठा बंगला होता. जयंतीलाल ठाणावाला यांचे वडील त्रिभुवनदास ठाणावाला सगळ्या चाळीतल्या राहणाऱ्यांना फटाके वाटत असत. त्यामुळे चाळीत अत्यंत आनंदाचे वातावरण असे. फटाके चारपाच दिवस अगोदर अंगणात उन्हात सुकत ठेवत असू. यंदा दिवाळीतच पाऊस पडत असल्याने फटाके अंगणात सुकवत ठेवण्याची संधी नाही. त्यावेळी लहान मुले हट्टाने काही फटाके वाजवायला सांगत असत, तसे वाजवलेही जात. मला तीन बहिणी, त्यांना पाकिटात दोन-दोन रु पये घालून भाऊबीज देत असू. खूप आनंदी वातावरण होते. वर्षातून एकदा किंवा दोनदा नव्या कपड्यांची खरेदी होत असे. गणेशोत्सवात खरेदी केल्यानंतर थेट दिवाळीतच खरेदी केली जात होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी चिराटी फोडली जात, उटण्याने एकामागोमाग अंघोळी होत असत. घरामध्ये तीन किंवा चार मुले असतील, तर त्यांचे कपडे सारखेच. कारण, एकच तागा घेतला की, पैसे कमी लागत होते. आज पैसा आला आणि एकत्र कुटुंबपद्धती जवळजवळ संपली. मी, माझा मुलगा, माझी बायको ही विभक्त कुटुंबपद्धती आता आपण स्वीकारली आहे. दिवाळीतले आम्ही अनुभवले त्याला ‘सेलिब्रेशन’ म्हणता येणार नाही. त्याला मराठी भाषेत खºया अर्थाने ‘दिवाळी’ साजरी होत असे, असेच म्हटले पाहिजे. आज पैसा आला आणि सर्व गणिते बिघडली. आता दिवाळी साजरी होत नाही तर ते सेलिब्रेशन झाले आहे. लक्ष्मण चाफेकर (लेखक ९३ वर्षांचे आजोबा आहेत) 
रेडिमेड किल्ले येऊ लागल्यावर दिवाळी बदलली
आज सर्वजण वर्षभर काम करत असतात. त्यांना असा फिरण्याचा वेळ मिळत नाही. नोकरीच्या मागे धावणारे तरुण पैसे खूप कमवतात. परंतु, स्वत:साठी तो पैसा खर्च करण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त मिळतो. कारण, आॅफिसमध्ये येण्याजाण्याची वेळ निश्चित नसते. लहानपणीची दिवाळी आजही मला चांगलीच आठवते. लहान असताना गिरगावच्या चाळीत आईच्या वडिलांकडे (माझ्या आजोबांकडे) फटाके उडवत होतो. परंतु, बंदूक कधीच मिळाली नाही. का? तर आईचा बंदुकीला विरोध होता. बंदुकीच्या बदल्यात काहीही घे, असे ती म्हणायची. पण, तेव्हा मी बंदुकीच्या बदल्यात काही घेत नव्हतो. जसा मोठा होत गेलो तेव्हा मी दिवाळीकडे बघताना काहीसा त्रयस्थच होतो. कारण, माझ्या आयुष्याची जडणघडणच वेगळी झाली होती. माझे मन दुसरीकडे म्हणजे विज्ञानात रमत होते. पूर्वी फक्त दिवाळीत कपडे खरेदी केले जात किंवा एखादी नवीन वस्तू घेण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधला जात होता. आता वर्षभर काही ना काही खरेदी सुरूच असते. हल्ली फटाके उडवत नाही, ते लांबूनच पाहतो. थोडे एन्जॉय करतो. हल्लीची पिढी ही पर्यावरणाबाबत सतर्क झाली आहे, अनेकजण आता फटाके उडवत नाहीत, त्यांना पर्यावरणाचा विनाश करायचा नसतो. दिवाळीत नवनवीन प्रकारांचे कपडे, वस्तू बाजारात येत असतात. व्यवसाय वाढलेला असतो. परंतु, दिवाळीतील चारही दिवसांकडे मी अत्यंत तटस्थपणे बघतो. कारण, त्याला काळाचे भान आहे. पूर्वी मातीचे किल्ले बनवले जात. परंतु, आता किल्लेपण रेडिमेड यायला लागले आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याचे स्वरूपच बदलत आहे. करण चाफेकर (लेखक २९ वर्षांचा नातू आहे) - शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे


पैसा कमी असला तरी आनंद खूप मोठा होता

आमच्या वेळेची दिवाळी म्हणजे खेडेगावातील मौजमजेची होती. दिवाळी आली की, साफसफाई हा एक मोठा सोहळा असायचा. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने अंगण झाडून, चोपून, शेणाने सारवून घेणे, फळीवरचे ठेवणीतले पितळी, तांब्याचे डबेडुबे धुऊन उन्हात वाळवले जायचे.
घरातील साफसफाई झाली की, घरातल्या आजूबाजूच्या आयाबाया वाण सामानाची यादी करायच्या. वाण्याने पाठवलेले सामान एकत्र साफ केले जायचे. खूप आधी तर घरीच दळणकांडण मग हळूहळू गिरण्या आल्या. तरी भाजण्या घरीच असायच्या. आजूबाजूच्या बायका, घरातल्या आयाकाकू, आजी, सुना सगळ्या मिळून हसतखेळत फराळ करायच्या. फराळ करताना घरात किती, दुखवट्याच्या घरी, लेकी, माहेरवाशिणी सगळ्याकडे पाठवायच्या. बेताने किलोच्या मापाने फराळ व्हायचा. एकीकडे फराळ सुरू असताना बायकांचा खरेदीचा उत्साह असायचा. दुकानात जाऊन १० कपडे हाताळून हवी ती खरेदी. दुकानात फिरण्याची मजा वेगळी होती. सगळेच एकत्र जाऊन वर्षातून एकदाच केली जाणारी खरेदी एन्जॉय करायचो. घरातल्या मुली मग त्या सख्ख्या चुलत सगळ्यांना एकाच ताग्यातले फ्रॉक आणि मुलांना एकाच ताग्यातले शर्ट शिवायला टाकायचे. क्वचित, चपला खरेदी व्हायची. पणत्या, रांगोळी आणली जायची. बांबूच्या काड्या गरम पाण्यात भिजवून त्यापासून घरीच आकाशकंदील बनविले जात होते. त्यात पणती ठेवून कंदील वर चढवले जायचे. वर घुमट आणि खाली झिरमळ्या किंवा फार तर चांदणी इतकेच प्रकार असायचे.
परिस्थिती बेताचीच असल्याने खरेदी खूप नसली तरी पाहुणे यायचे आणि सगळे सण-वार एकत्र साजरे व्हायचे. जेवणाच्या पंगती असायच्या. पहाटे लवकर उठून कोण सगळ्यात आधी फटाका उडवणार, यात भावंडात चढाओढ असायची तर आयाआजीची तेल उटण्याची गडबड असायची. अभ्यंगस्नानाला औक्षण करायची लगबग असायची.
वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस घरातल्या गायवासरांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालायचे. धनतेरसला एखादे स्टीलचे भांडे घ्यायचे. धान्याच्या अक्षता वाहून घरातल्या धनाची पूजा करायची. लक्ष्मीपूजनाला सगळे घरातले नटूनथटून घरातल्या लक्ष्मीची पूजा करायचे. फराळाची रेलचेल असायची. चार प्रकारचे लाडू, दोन चिवडे, चकल्या, चिरोटे, करंज्या, शंकरपाळे, अनारसे अगदी सगळे असायचे तेही घरी केलेले. डाएट, लेस आॅइल, बेक्ड वगैरे काही न बघता दिवाळीच्या दिवशी सगळे कुटुंब एकत्र बसून हसतखेळत फराळ करायचे. पाहुण्यांना अगत्याने फराळाला बोलवणे आणि तितक्याच अगत्याने आपणही त्यांच्याकडे जाणे असायचे. भाऊबीजेला सासुरवाशीण भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसायची आणि मामा येणार म्हणून भाचे मंडळी आनंदाने नाचायची. बहिणीच्या ओवाळणीत रुपया, सव्वा रुपया पडला तरी तोळाभर सोन्याचा आनंद असायचा. तोच प्रकार पाडव्याला. हा नवरा बायकोचा सण. नवऱ्याला बायको तेल उटणे लावून ओवाळणी करायची आणि हक्काने ओवाळणी घ्यायची. सायंकाळच्या वेळेत सगळे एकमेकांना भेटायला घराबाहेर पडायचे. नवीन कपडे, नवीन खरेदी एकमेकांना दाखवणे, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे ही दिवाळीची मजा होती.
पैसे, गरजा, खरेदी खूप कमी असली तरी आनंद, पाहुणे अगत्य याला तोटा नव्हता. मग हळूहळू पुढच्या पिढीचे राज्य आले. नोकरी धंद्याच्या निमित्ताने पोरे दूर गेली. पैसा आला, घरे मोठी झाली. खरेदी वाढली आणि आनंद मात्र कमी होत गेला. त्यानंतर मग अंगण शिंपायचं कमी झाले. डबे फळीवरून उतरेनासे झाले. किलोकिलोने होणारा फराळ अगदीच ग्रॅममध्ये दिला व घेतला जाऊ लागला. भाऊबीजेच्या पाचदहा रुपयांच्या मनिआॅर्डरची जागा आता अ‍ॅमेझॉन आॅनलाइन डिलिव्हरीने घेतली. दिवाळीच्या निमित्ताने सासरमाहेरात आणि इतर नातेवाईक यांच्यात होणाºया पत्राची जागा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकने घेतली. आता अशी दिवाळी फक्त आठवणीत आहे.  - ऊर्मिला मुनिश्वर (लेखिका ९२ वर्षांच्या आजी आहेत.)


आता ऑफिसमध्येच एन्जॉय करतो दिवाळी
आमची पिढी म्हणजे साधारण पस्तिशीची. लहानपणी आईआजीला दिवाळीची लगबग करताना पाहिलेली. पण सगळे वेगळे म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा आणि आम्ही दोघे भाऊबहीण. परीक्षा चालू असतानाच दिवाळीची सुटी, त्यातलं प्लानिंग, नवीन कपडे याचे विचार सुरू असायचे. आजी, आई साफसफाई करायच्या, तेव्हा त्यांच्या हाताखाली लहानसहान कामे आम्ही करावीत, यासाठी आम्हाला पिटाळायच्या. आईने वाण्याकडून काही सामान आणायला सांगितले की, अर्धवट खेळ सोडून धावतच जायचो आणि सामान आणून आईच्या ताब्यात दिले की, पुन्हा खेळ सुरू व्हायचा. मित्रमैत्रिणी कुणाहीकडे फराळ असायचा, त्यामुळे कुठेही गेले तरी दिवाळीच्या दिवसात काही ना काही खाऊ मिळायचाच.
एखाद्या दिवशी बाबा आॅफिसमधून लवकर आले की, आईबाबांसोबत जाऊन कपडे, चप्पल, वगैरे खरेदी व्हायची. रांगोळी, आकाशकंदील, पणत्या सगळी खरेदी आई करायची, पण गर्दीतून चालायला कधी कंटाळा आला नाही. रंगीत कंदील, माळा दिवाळीच्या दोन दिवस आधीच लागायच्या.
लहानपणी खेळ, किल्ले यात रमतारमता कॉलेजचे दिवस सुरू झाले. मित्रमैत्रिणींसोबत खरेदी आणि दिवाळीत सकाळी उठून नटून फडके रोडला जाणे असायचे. डोंबिवलीमध्ये फडके रोड हा गेल्या तीन पिढ्यांचा अगदी हक्काचा अड्डा. अनेक प्रेमकथा इथेच जन्मल्या आहेत. मोबाइल, फ ोन, इंटरनेट नसताना असायचा तो फडके रोडवरचा देवा शर्ट्सचा नाका. समोर चहाची टपरी. बागेजवळचा पाणीपुरीवाला. इथेच दिवाळीच्या दिवशी सकाळी यायचे प्लानिंग आठवडाभर आधी ठरायचे.
दिवाळी पहाट फडके रोडला साजरी केल्यानंतर घरी जाऊन घरच्यांसोबत फराळ, जेवण, लक्ष्मीपूजन आणि मग मित्रमैत्रिणीबरोबर पुन्हा बाहेर. फटाके तसे खूप नाही उडवले. कळायला लागल्यापासून तर नाहीच. आईवडिलांसमोर अगदी साळसूदपणाचा आव आणून कौतुक पदरात पाडून घेणे ही एक वेगळीच मजा होती. गेल्या १० वर्षांत आयुष्य रॅपिड स्पीडने बदलले. मोबाइल आले तसे प्लानिंग लास्ट मोमेंट ठरले. कार आल्या तशा फडकेला जायच्याऐवजी लॉंग ड्राइव्हला पसंती मिळाली. मल्टीनॅशनलचा जॉब लागल्यावर सुटी केवळ एक दिवसाची मिळू लागली. मग, घरी दिवाळी साजरी झालीच नाही. घराऐवजी आॅफिस डेस्क सजवणे. लहानपणापासून असलेले मित्रमैत्रिणी सोडून आॅफिस कलिगबरोबर दिवाळी पार्टी करणे. तिथे मराठी मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र मिळून आमच्या अमराठी मित्र परिवारासाठी फराळ नेऊ लागलो. नातेवाइकांचा ओढा कमी झाला.
आता वर्षभर काय महिन्यातून एकदा खरेदी असल्याने आणि चकली चिवडा १२ महिने दुकानात उपलब्ध होत असल्याने लहानपणी होते तसे अप्रूप राहिलेले नाही. मित्रमैत्रिणी, घरी आईबाबा यांच्यात दिवाळी होते. नातेवाइकांकडे जाण्यापेक्षा फॅमिली ट्रिप्स होतात.आता मुलगी कॉलेजमध्ये आहे. तिचे गेले आठवडाभर फडके रोडला जायचे प्लानिंग सुरू आहे, ते बघून चक्र फिरत असल्याची जाणीव झाली आहे. काळाबरोबर आनंद आणि एन्जॉयमेंट यांच्या व्याख्यादेखील बदलत राहतील. दिवाळी साजरी होईल. पण, लहानपणी आजीआईने तेल उटणे लावून अंघोळ घातलेली दिवाळी कायम मनात तेवत राहील. -शर्वरी मुनिश्वर(लेखिका तरुण नात आहे.) - शब्दांकन : जान्हवी मोर्ये


अंगणातील दिवाळीचा आनंद वेगळा होता
आमच्या काळात दिवाळी ही खऱ्या अर्थाने दिव्यांचा सण होता. आज लायटिंग लावून कितीही घर उजळण्याचा प्रयत्न केला तरी खरा प्रकाश हा दिव्यांमुळेच येतो. काळ बदलला आणि जागाही बदलली. पूर्वी आमच्या काळात घर आणि घरासमोरील आंगण हीच दिवाळीची शोभा होती. अंगण तयार करण्यापासून ते सारवण्यापर्यंतचे सर्व काम दिवाळीपूर्वी करत होते. आज फ्लॅटमध्ये आल्याने ते काम कमी झाले. बदलत्या स्थितीनुसार दिवाळीचा आनंद काही अंशी कमी झाल्याचा भास होतो.
दिवाळी म्हटले की दिव्यांचा सण. आमच्या काळात चाळीतील घरासमोरील अंगणातच दिवाळी साजरी होत होती. घराची स्वच्छता करण्याचे काम तर महिनाभर पूर्वीच सुरू होत होते. घरातील सर्व भांडी स्वच्छ करणे, घराला आतून बाहेरून रंग लावणे, तोही कारागिराला न बोलावता स्वत: लावणे. ही सर्व कामे महिनाभर सुरू राहत होती. दिवाळीच्या दिवशी घरात फराळ बनवणे, नवीन कपडे खरेदी करणे याची लगबग सुरू राहत होती. पहाटे ४ वाजता उठून घरातील अंगण सारवणे, त्यावर रांगोळी रेखाटणे, सायंकाळी दिव्यांची आरास करणे ही सर्व कामे केली जात होती. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले जात होते. अर्थात, आजही करते. आपल्या सुरुवातीच्या काळातील दिवाळी ही अनोखी दिवाळी होती. आज तो आनंद दिवाळीत दिसत नाही. मात्र ती चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सातत्याने असतो. आजही घरातील दिवाळी साजरी करताना फराळ घरात बनवण्याचे काम करते. बाहेरून फराळ कधीच आणला नाही. आजची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी यात खूप अंतर आहे. - मंगला पाटील (लेखिका या महेंद्र पाटील यांची आई आहे) - शब्दांकन : पंकज पाटील


चाळीतील दिवाळीच खरी दिवाळी
आज फ्लॅट संस्कृती आहे. मीही त्या संस्कृतीच्या साच्यात स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझे बाळपण ज्या चाळीत गेले ती चाळ आणि त्या चाळीतील सणवार आजही आठवणीत आहेत. चाळीतील दिवाळी आजही माझ्या स्मरणात आहे. माझ्या स्वत:च्या आणि हक्काच्या फ्लॅटमध्ये मला दिवाळीचा आनंद घेता येत नाही. एवढेच नव्हे तर पाच वर्षांपासून मी दिवाळीला लक्ष्मीपूजनला घरी राहत नाही. कामानिमित्त बाहेर लागत आहे. यंदा दिवाळीत घरी राहणार या संकल्पनेतून सुटीही घेतली होती. अचानक एका नव्या चित्रपटाच्या संवादलेखनासाठी बोलवल्याने पुन्हा मला दिवाळीच्या दिवशी बाहेर जावे लागत आहे. काही वर्षांत दिवाळी घरी कमी बाहेर जास्त साजरी होत आहे. त्यामुळे दिवाळीचा खरा आनंद घेता येत नाही. माझ्या आठवणीतील खरी दिवाळी म्हणजे चाळीतील दिवाळी. वांद्रापाडा भागात गंगाराम गायकवाड चाळीत जी दिवाळी साजरी होत होती, तीच दिवाळी खरी होती. सर्व एकत्रित येऊन दिवाळी साजरी करत होतो. आनंद साजरा होत होता. इमारतीत राहण्यासाठी आल्यावर हवा तसा आनंद घेत येत नाही. तरीही घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. दिवाळीच्या दिवशी कोणतेही काम लागेल या कल्पनेतून १० दिवस आधीच सर्व खरेदी करून ठेवतो. कपडे, दिवाळी सजावटीचे साहित्य, फराळाचे साहित्य हे सर्व आधीच खरेदी करतो. त्यामुळे दिवाळीत काम लागले तरी गोंधळ होत नाही. दिवाळीतील फटाक्यांचे विशेष आकर्षण नसले तरी कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याचा आनंद वेगळा आहे. दिवाळीत काम लागले तरी एखाद्दुसरा दिवस कुटुंबासह घालवण्याचा प्रयत्न करतो. मित्र परिवारांची भेट घेणे, नातेवाइकांसोबत संवाद साधून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे. ज्यांना भेटणे शक्य आहे त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांकडे फराळासाठी आवर्जून जातो. दिवाळीपूर्वी घरातील साफसफाईसाठी घरच्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात घरी असलो तरच हे शक्य होते - महेंद्र पाटील (लेखक हे चित्रपट पटकथा/संवाद लेखक आहेत.)
 

Web Title: Diwali is yours-ours; What are the festivities for a new generation of awakened memories?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी