कोपर पूल अडकला निविदेच्या फेऱ्यात; कागदपत्रांमधील त्रुटीमुळे तिसरी निविदाही बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:40 AM2020-03-14T00:40:39+5:302020-03-14T00:41:00+5:30
केडीएमसी चौथ्यांदा राबवणार प्रक्रिया
![Corner pool stuck in tender round; Third tender dismissal due to errors in the documents | कोपर पूल अडकला निविदेच्या फेऱ्यात; कागदपत्रांमधील त्रुटीमुळे तिसरी निविदाही बाद Corner pool stuck in tender round; Third tender dismissal due to errors in the documents | कोपर पूल अडकला निविदेच्या फेऱ्यात; कागदपत्रांमधील त्रुटीमुळे तिसरी निविदाही बाद](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/t-13-03-09_202003387056.jpg)
कोपर पूल अडकला निविदेच्या फेऱ्यात; कागदपत्रांमधील त्रुटीमुळे तिसरी निविदाही बाद
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल नव्याने बांधण्यासाठी केडीएमसीने आतापर्यंत दोनदा निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. तिसºया वेळेस एका कंत्राटदाराने निविदा भरली. परंतु, त्याच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्याची निविदाही बाद ठरली आहे. त्यामुळे या पुलासाठी आता चौथ्यांदा निविदा मागविण्यात येणार आहेत. पुलाचे काम निविदेच्या फेºयात अडकले असून, ते सुटल्याशिवाय कामाला गती मिळणार नाही.
कोपर रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद करण्याचे आदेश रेल्वेने महापालिकेस दिले होते. त्यानुसार, १५ सप्टेंबर २०१९ ला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलाचा खर्च रेल्वे व महापालिकेने अर्धाअर्धा देण्याचा विषय होता. मात्र, पुलाच्या कागदपत्रांचा पत्ता नसल्याने त्यात वेळ गेला. दुसरीकडे नगरसेवकांनी रेल्वेकडून मिळणाºया ५० टक्के खर्चाची वाट न पाहता महासभेत तातडीने १० कोटी रुपये खर्चास मान्यता दिली. त्यामुळे निविदा मागविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, दोनदा निविदा मागविल्या गेल्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे कंत्राटदार रेल्वेकडे असतात. त्यामुळे कंत्राटदार सुचवावा, अशी विनंती महापालिकेने रेल्वेकडे केली होती. मात्र, त्यास रेल्वेने प्रतिसाद दिला नाही.
तिसºया फेरीत एका कंत्राटदाराने निविदा भरली. मात्र, त्याच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने छाननीत त्याची निविदा बाद झाली. आता पुन्हा चौथ्यांदा निविदा मागविली जाणार आहे. पूल वाहतुकीसाठी बंद करून सात महिने उलटून गेले तरी त्याच्या निविदेस प्रतिसाद मिळत नाही. पुलाच्या कामात दिरंगाई होत असल्याने डोंबिवलीतील नागरिकांना ठाकुर्लीच्या रेल्वे अरुंद पुलावरून वाहतूक करावी लागत आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.
पूलकोंडी सुटेना
कल्याणच्या पत्रीपुलाला विलंब होत आहे. तर, दुर्गाडी येथील खाडीपुलाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका मेअखेरपर्यंत सुरू होतील. डोंबिवली, मोठागाव ठाकुर्ली येथील माणकोली खाडीपुलाचे काम अर्धवट आहे. सध्या हे काम डोंबिवलीच्या दिशेने झाले आहे. भिवंडीच्या दिशेने कामाला गती नाही.