संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद ठरवून - आ. बच्चू कडू यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:09 IST2017-12-03T00:09:44+5:302017-12-03T00:09:58+5:30
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला.

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद ठरवून - आ. बच्चू कडू यांचा आरोप
ठाणे : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला. मराठी पाट्या बदलून मराठीपण जपले जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मनसेच्या आंदोलनावरही टीका केली.
ठाणे महापालिकेत दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज यांच्यावर थेट आरोप केला. यापूर्वी अबू आझमी आणि मनसेमध्ये अशाच प्रकारे ठरवून वाद करण्यात आला होता. या वेळीदेखील ठाकरे आणि निरुपम यांच्यातील वाद ठरवून केलेला असून जनतेला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्षच केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
ऊस, तूर आणि कापूस यांना योग्य भाव मिळावा, म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी या वेळी केली. मराठी किंवा अमराठी असा मुद्दा नसून केवळ प्रांतवाद हा राजकीय मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात यूपीतून आलेले टॅक्सीचालक आहेत. मराठीचा पुळका घेणाºयांनी मराठी माणसासाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.