फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने नागरीक हैराण
By Admin | Updated: October 6, 2015 23:52 IST2015-10-06T23:52:33+5:302015-10-06T23:52:33+5:30
शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा

फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने नागरीक हैराण
भिवंडी : शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा अतिक्रमण विभाग काही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांत संताप आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडई प्रभूआळी, पारनाका ते शिवाजी चौकापर्यंत चारचाकी वाहने रस्त्यात उभी करून त्यांचे मालक बाजारहाट करण्यासाठी जातात. फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी हा रस्ता नेहमी व्यापलेला असल्याने नेहमी
वाहतूक कोंडी होते. यामधून नागरीकांना दुचाकी वहाने चालविणे कठीण झाले आहे. बीजेपी दवाखाना, पारनाका, भिवंडी टॉकिज, कासारआळी चौक व नझराना चौक येथे कायम वहातूक कोंडी असल्याने पाच मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी कधी कधी तर तब्बल अर्धा तास लागतो.
तसेच मंडई ते आनंद दिघे चौक दरम्यान लाला शॉपिंग ते हनुमान बावडी, कोटरगेट मशीदजवळ वहातूक कोंडी होते. मंडई ते धामणकरनाका दरम्यान बोबडे कंपाऊण्डजवळ, धामणकरनाका ते एस.टी.दरम्यान कणेरी हत्ती सायझिंग समोर, राजीवगांधी चौक, जकातनाका, एस.टी.स्थानक या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. कल्याण रोडवर आजबीबी ते पाईपलाईन दरम्यान नेहमी वहातूक कोंडी होत असते.
शहरातील या मुख्य मार्गावर बंद गाड्याही उभ्या असतात. तर कोठे फेरीवाल्यानी व हातगाड्यांनी अतिक्रमण केलेले असते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व शहर वाहतूक पोलीसांनी स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोवस्त घेऊन ही धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनीधी)
उपायुक्तांचा प्रतिसाद नाही
-महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यान्वीत नसल्याच्या तक्रारीसाठी उपायुक्ता विजया कंठे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शहर वहातूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्ही.एन.कारकुट यांनी प्रत्यक्ष पहाणी करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या वहानांवर कारवाई केली आणि लवकरच या मार्गावर दुचाकी वहानांना तारखेनुसार पार्किंगसाठी अधिसूचना जाहिर करणार असल्याचे सांगीतले.
-श्रावण महिना व गणेशोत्सवा दरम्यान या सर्व मार्गावर वहातूक कोंडी झाल्याच्या तक्रारी असताना मनपाने कोणतीही कारवाई केली नाही.तर वहातूक पोलीस गणेशोत्सवाच्या काळात दिसले. पुढे नवरात्रोत्सव व दिवाळी हे सण येत असल्याने शहर वहातूक पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तीक कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.