सुट्या पैशांअभावी व्यवसाय बंद
By Admin | Updated: November 17, 2016 07:27 IST2016-11-17T07:27:07+5:302016-11-17T07:27:07+5:30
सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने बहुतांश छोटेमोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, औषधांची दुकाने, किराणा दुकानदार यांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

सुट्या पैशांअभावी व्यवसाय बंद
मुरबाड : शासनाने पाचशे व हजाराच्या नोटा बंद केल्याने सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने बहुतांश छोटेमोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, औषधांची दुकाने, किराणा दुकानदार यांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
तालुक्यातील मुरबाड, सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक व्यावसायिकांनी छोटेमोठे व्यवसाय, हॉटेल थाटली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून चलनातून पाचशे आणि एक हजार रु पयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्याने सुट्या पैशांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे काही ठिकाणी हॉटेल बंद केली असून किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला दुकाने बंद ठेवल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. विशेष म्हणजे तासन्तास बँकेच्या दारात सुटे पैसे काढण्यासाठी उभे राहूनदेखील नंबर येण्याअगोदरच बँकेतील पैसे तरी संपतात किंवा वेळ संपल्याने बँक बंद होते. यामुळे हिरमुसले होऊन आल्या पावली हात हलवत परत जावे लागत असल्याने सहनशीलता संपत चालली आहे. (वार्ताहर)