शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भाजपचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:06+5:302021-02-24T04:41:06+5:30
भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेने महामार्गाजवळच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास ...
भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेने महामार्गाजवळच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास सत्ताधारी भाजपने सोमवारच्या स्थायी समिती सभेत विरोध केला आहे.
भाजपने बहुमताच्या बळावर हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने शिवसेना, काँग्रेससह विविध स्तरांतून भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण एकीकडे सुरू असून, त्याठिकाणी जाणाऱ्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या जंक्शनवर सगणाई देवी मंदिराजवळ रस्त्यांच्यामध्ये मोठी जागा मोकळी आहे. त्यामुळे या जंक्शनवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा ठराव २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्याकामी शिल्पकार नेमण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांची निविदा काढली होती. या कामासाठी गारनेट इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा भरली होती. हे काम विशेष व वाकबगार शिल्पकारांचे असल्याने आलेली निविदा मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समितीला सादर केली होती.
सत्ताधारी भाजपने प्रस्तावास विरोध करत निविदा पुन्हा सादर करण्याचा ठराव नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला. बहुमताने तो मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला. विशेष म्हणजे भाजपने महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याची भूमिका घेतल्याने भाजपचेच नगरसेवक सुरेश खंडेलवाल सभा सोडून निघून गेले.
याबाबत उपमहापौर हसमुख गेहलोत, ठराव मांडणारे जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी टीका केली आहे.
भाजपचे शिवछत्रपतींबद्दलचे प्रेम बेगडी असून, महाराजांपेक्षा यांना टेंडर टक्केवारीतील मलई खण्यात स्वारस्य असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास केलेला विरोध संतापजनक असून, नागरिक व मनसे त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत यांनी म्हटले आहे.