बिल्वदलवासियांची परवड सुरूच
By Admin | Updated: August 28, 2015 23:25 IST2015-08-28T23:25:41+5:302015-08-28T23:25:41+5:30
अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा

बिल्वदलवासियांची परवड सुरूच
कल्याण : अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा लढा सुरूच असून पुनर्वसनासाठी पुन्हा एकदा त्यांनी केडीएमसीला साकडे घातले आहे.
रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी मिळत नाही तोपर्यंत संबंधित मालकाला इमारतीची पुनर्बांधणी करण्याची परवानगी मिळणार नाही, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले होते. परंतु, त्या दृष्टीकोनातून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
मनपाचे नोटिसीलाही उत्तर नाही
वर्षापूर्वी प्रत्येक रहिवाशाकडून इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये घेतले होते. परंतु, ते काम पूर्ण केले नाही, इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत हमीपत्र सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र या सर्व बाबींना हरताळ फासून परवानगी नसताना ती जमिनदोस्त केली. कायदा धाब्यावर बसवून नियमबाहय प्रकारे हे केल्याचे नोटीशीत नमूद केले होते. या नोटीशीला उत्तर देण्याचे सौजन्य अद्यापपर्यंत महापालिकेने दाखविलेले नाही.
पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत संक्रमण शिबीर अथवा बीएसयूपी सारख्या प्रकल्पात करावी जेणेकरून धोकादायक इमारतीतून बेघर झालेल्या कुटुंबाची गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष वेधले आहे. यावर तातडीने मालक आणि भाडेकरूंची बैठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिल्याचे रहिवाशी संजय मांजरेकर यांनी सांगितले.