सातबारा आॅनलाईन झाल्याने बळीराजांची कोंडी
By Admin | Updated: September 14, 2016 04:17 IST2016-09-14T04:17:50+5:302016-09-14T04:17:50+5:30
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़

सातबारा आॅनलाईन झाल्याने बळीराजांची कोंडी
राहुल वाडेकर, विक्रमगड
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़ परंतु विक्रमगड व परिसरात अजूनही आॅनलाइनची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होते आहे़ तसेच नवीन नोंदी, फेरफार टाकण्यासही मोठा कालावधी लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ नागरिकांनी या कामांसाठी थांबायचे तरी किती संबंधीत अधिकारी नुसते वायदे करीत असून या वायद्यांनी आता जनता हैराण झाली आहे़ अनेकांनी जमिनी विकत घेऊन फेरफार नोंदणीची किंवा वारस नोंदणीची प्रकरणे टाकली आहेत़ परंतु गेल्या दोनतीन महिन्यांपासून ही कामे रखडल्याने शेतकरी, व्यापारी आणि गरजूंची मोठी कोंडी झाली आहे़ त्यामुळे तूर्तास तरी हस्तलिखित सातबारा देण्यांत यावेत, अशी मागणी पंचक्रोशीतीतून होत आहे़विक्रमगड तालुक्यातील ९४ गाव पाडयांतील जनतेचे हाल होत आहेत़
रोजच लोक विविध कामांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयासमोर येऊन बसतात व आॅनलाइनचे काम अर्धवट असल्याची सबब ऐकून परत खाली हाताने जातात़त्यामुळे सामान्य जनता,आदिवासी आणि शेतकऱ्यांची, बॅकेची कामे, शासकीय योजनांचा लाभ, तसेच रजिस्ट्रेशन यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेला ७/१२ व फेरफार मिळेनासे झाले आहेत़ परिणामी सगळीच कामे ठप्प झाली आहेत.