भंडाऱ्यासाठीचे धान्य कुपोषणग्रस्तांना
By Admin | Updated: September 12, 2016 03:06 IST2016-09-12T03:06:52+5:302016-09-12T03:06:52+5:30
अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा

भंडाऱ्यासाठीचे धान्य कुपोषणग्रस्तांना
अंबरनाथ : अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा स्वरुपात संकलीत होणारे धान्य कुपोषणग्रस्तांना देण्याची संकल्पना शिवसेनेच्यावतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागांना हे धान्य पाठविण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू होतात. पालघर जिल्ह्यात जुलै २०१६ पर्यंत ७ हजार ३२० बालके कुपोषित असल्याची माहिती सरकारी अहवालातून उघड झालेली आहे. तर मोखाडयात जुलै महिन्यात १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. शेजारील तालुक्यात भूकेपोटी मृत्यू होत असताना मानवी जीव वाचवणे महत्वाचे आहे की नाही, असा प्रश्न शिवसेनेनी केला आहे. एकीकडे लहान बालकांचे कुपोषणाने मृत्यू होत असताना दुसरीकडे गणेशोत्सवाच्या नावाने अनेक मंडळे भंडारा देऊन मंडळाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही विसंगती आहे. याच सार्वजनिक मंडळांनी भंडारासाठी एकत्रित होणारे धान्य गोळा करुन ते कुपोषणग्रस्त भागांना वाटप केल्यास त्या बालकांना चांगला आहार मिळण्यास मदत होईल. अंबरनाथ शहरातल्या सुमारे ५० ते ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फेअन्नदानाचा कार्यक्र म आयोजित केला जातो. यासाठी हजारो किलो धान्याचा वापर केला जातो. आम्ही या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पत्रक पाठविले असून त्यांनी महाभंडाऱ्याचा कार्यक्र म रद्द करून त्यासाठी लागणारे सर्व धान्य शिवसेना शाखेकडे सुपूर्द करावे, अशी विनंती संबंधित पदाधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती वाळेकर यांनी दिली. १० दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर जमा होणारे शेकडो किलो धान्य पालघर जिल्ह्यात पाठवणार आहोत, असेही वाळेकर यांनी सांगितले. शहरातील उद्योगपती, कारखानदार, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था यांच्यासह शहरातील नागरिकांना देखील कुपोषित बालकांना अन्नदान अथवा अन्य स्वरुपात मदत शिवसेना अंबरनाथ शहर शाखेत आणून द्यावी असे आवाहन सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.