अमराठी भाषकांनाही ठाणेकर ओळख हवी

By Admin | Updated: January 31, 2017 03:05 IST2017-01-31T03:05:42+5:302017-01-31T03:05:42+5:30

ठाण्याच्या महापालिका निवडणुकीत जसे मूळ टाणेकर आपल्या अस्मितेसह उतरले आहेत, तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यात वसलेले नागरिकही आहेत.

Amarthi Bhabans should also get Thanekar identity | अमराठी भाषकांनाही ठाणेकर ओळख हवी

अमराठी भाषकांनाही ठाणेकर ओळख हवी

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे

ठाण्याच्या महापालिका निवडणुकीत जसे मूळ टाणेकर आपल्या अस्मितेसह उतरले आहेत, तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यात वसलेले नागरिकही आहेत. त्यांनी आपापले प्रश्न राजकीय पक्षांसमोर मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यातच क्षीण का होईना, पण एक आवाज पुढे येतो आहे, परप्रांतीयांचा.
त्यात केवळ उत्तर भारतीय नाहीत, तर दाक्षिणात्य, गुजराती असे विविध भाषकही आहेत. आम्हाला आमच्या प्रांताची नव्हे, तर ठाणेकर म्हणूनच ओळख द्या, असे ते आवर्जून सांगतात.

दाक्षिणात्यांचाही
विचार करा
ठाण्यात दाक्षिणात्य नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात आणि ते सुशिक्षीत आहेत. अनेक चांगली कामे ते समाजात राहून करतात. खरे तर त्यांना लोकप्रतिनिधींनी चांगला पाठिंबा द्यायला हवा. आम्हाला दाक्षिणात्य म्हणून वागणूक न देता एक ठाणेकर आहोत, हीच भावना त्यांनीही मनात ठेवावी. कारण मत आम्ही येथेच देतो. तसेच, आमच्या समाजातील चांगल्याा, सुशिक्षित व्यक्तीलाही उमेदवारी द्यावी. त्याचा शहराच्या विकासासाठी फायदाच होईल. -डॉ. रुपा नायर

व्यापाऱ्यांचे प्रश्नही सोडवा
रस्ता रुंदीकरणात अनेक व्यापाऱ्यांची दुकाने तोडली. रस्त्यांचे रुंदीकरण ही चांगली गोष्ट आहे, या भावनेने अनेक व्यापाऱ्यांनी योगदान दिले. परंतु हा रूंद झालेला रस्ता, फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापला आहे. व्यापाऱ्यांमध्ये या समस्येविषयी प्रचंड नाराजी आहे. एखाद्या व्यापाऱ्याला व्यवसाय करायचा असेल, तर त्याला आठ ते दहा परवाने काढावे लागतात आणि दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागते. परंतु एका व्यवसायासाठी एकच परवाना आणि नुतनीकरणाचा कालावधी पाच वर्षे करावा, अशी आमची मागणी आहे.
-रोहितभाई शहा, उद्योजक

उत्तर भारतीय भवन हवे
३० ते ४० वर्षांत उत्तर भारतीयांसाठी ठाण्यात काहीही झालेले नाही. आम्हाला परप्रांतीय म्हणून वागणूक देत भेदभाव केला जातो. तो बंद करावा. वर्षानुवर्षे हा समाज हा ठाण्यात राहत आहे. आम्हीही ठाणेकर आहोत. आमच्या समाजाचे कार्यक्रम करण्यासाठी एकही भवन ठाण्यात नाही. ते प्रथम उभारले गेले पाहिजे. एखादा गरीब असेल, तर त्याला सभागृहासाठी भाडे मोजणे अशक्य आहे. त्यांच्यासाठी या भवनाचा फायदा होईल.
- संतोष मिश्रा

Web Title: Amarthi Bhabans should also get Thanekar identity