वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई
By अनिकेत घमंडी | Updated: January 31, 2024 16:43 IST2024-01-31T16:42:52+5:302024-01-31T16:43:35+5:30
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे.

वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली: महावितरणच्या वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. या वीज चोरट्यांनी ३२ लाख ५८ हजार रुपये किंमतीची १ लाख ५० हजार ४९४ युनिट विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. त्यांतर्गत वाडा उपविभागातील वाडा, अशोकवन, मैंदे, आमगाव, गायकरपाडा, डोंगस्ते, बिलावली, तुसा, काटी, देवघर, जामधर, उंबरखांड, पाच्छापूर, नेवाळे, खांबाळे, महाप, शिरोळे, बासे, वापे, खरीवली, दिघाशी, जांबिवली, चिंचघर, बिलोशी आदी परिसरात व्यापक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत ७९ जणांकडून सुरू असलेली ३२ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमांचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केली.