ठाणे जिल्ह्यातील एका ४३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. विनीत किणी असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. हा रुग्ण नायगावजवळील खोचिवडे गावात वास्तव्यास होता. न्यूमोनियाच्या उपचारासाठी त्याला मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनीतला ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने त्याला वसई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्यासह प्रशासन नागरिकांना लक्षणे आढळल्यास कोविड-१९ चाचणी घेण्याचे आवाहन करत आहे. ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. यातील १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३२ जण घरीच उपचार घेत आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मुंबई आणि ठाण्यात वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड तयार करण्यात येत आहेत.
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढदेशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१ वर पोहोचली आहे. रविवारपासून २०३ नव्या रुग्णांची भर पडली. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळून आली. केरळ १ हजार ४३५ रुग्णांसह आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र ५०६ रुग्णांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ३३८ आणि ३३१ रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकमध्ये २५३ रुग्णांची नोंद करण्यात आली आणि तामिळनाडूमध्ये १८९ रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.