सात वर्षांत दिव्यांग कल्याणासाठीचे २८ कोटी १३ लाख खर्चाविना वाया
By Admin | Updated: April 25, 2017 00:08 IST2017-04-25T00:08:57+5:302017-04-25T00:08:57+5:30
ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी आणि नव्या योजना हाती घेतल्या आहेत.

सात वर्षांत दिव्यांग कल्याणासाठीचे २८ कोटी १३ लाख खर्चाविना वाया
ठाणे : ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी आणि नव्या योजना हाती घेतल्या आहेत. यासाठी भरीव अशी आर्थिक तरतूदही केली आहे. परंतु, मागील सात वर्षांत दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनेसाठी मंजूर झालेल्या तब्बल ३४ कोटी २२ लाखांपैकी केवळ ६ कोटी ८ लाखांचा निधीच खर्च झाला असून उर्वरित तब्बल २८ कोटी १३ लाख रुपये खर्च झाले नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
ठाणे महापालिकेने यंदा दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेतल्या असून यासाठी सुमारे ९ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मोफत बस प्रवास, उपचार केंद्र, मोफत वैद्यकीय मदत, नाममात्र दरात शस्त्रक्रिया, पारितोषिक साहित्याचे वाटप, अंध व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी आॅडिओ लायब्ररी, दिव्यांगांकरिता नोंदणी केंद्र, दिल्लीच्या धर्तीवर स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करून त्या ठिकाणी स्कील असलेल्या स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी, प्रदर्शनासाठी एक मध्यवर्ती ठिकाण दिले जाणार आहे. कर्तव्य-कल्चर आॅफ केअर यासाठी तब्बल ५ कोटींची तरतूद केली आहे. यासह इतर विविध योजनांचादेखील समावेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी या योजनांसाठी केवळ दोन कोटींचाच निधी दिला जात होता. त्यानुसार, मागील वर्षी या योजनांचा केवळ १०० ते १२५ अपंगांनीच लाभ घेतल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, २०१४-१५ या आर्थिक वर्षात ८.५० कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार, या योजनेची अंमलबजावणी करावी, यासाठी अपंग संघटनांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यात या योजनांचा लाभ अपंगांच्या हाती पडेल, असे पालिकेने स्पष्ट केले. परंतु, या कालावधीत जाहीर केलेल्या १३ योजनांपैकी एकाही योजनेवर पालिकेने खर्च केला नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच मागील आर्थिक वर्षात या योजनेसाठी ९.५० कोटींची तरतूद केली होती. परंतु, हा निधीदेखील खर्च झाला नसल्याचेही समोर येत आहे.
एकूणच मागील सात वर्षांत या कल्याणकारी योजनांमधील किती निधी खर्च झाला, कसा झाला, यासंदर्भात युसुफ खान यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यानुसार, आठ वर्षांत या योजनांसाठी ३४ कोटी २२ लाखांच्या निधीची तरतूद केली होती. त्यापैकी केवळ ६ कोटी ८ लाख ५१ हजार ७६७ रुपयांचा खर्च झाला असून उर्वरित २८ कोटी १३ लाख ४८ हजार २३३ रुपयांचा निधी लॅप्स झाल्याचे त्यांना पालिकेने कळवले आहे. (प्रतिनिधी)