२६ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची नासाडी
By Admin | Updated: September 26, 2015 00:27 IST2015-09-26T00:27:55+5:302015-09-26T00:27:55+5:30
राज्यात परतीचा पाऊस समाधानकारकरित्या कोसळला असला तरी अजूनही शेतकऱ्यांवरील संकटासह शहरावरील पाणीकपातीचे संकट टळलेले नाही.

२६ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची नासाडी
पालघर : राज्यात परतीचा पाऊस समाधानकारकरित्या कोसळला असला तरी अजूनही शेतकऱ्यांवरील संकटासह शहरावरील पाणीकपातीचे संकट टळलेले नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पाणी वाचवणे गरजेचे असताना पालघरमध्ये २६ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू असून ती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
पालघर तसेच २६ गावे प्रादेशिक ग्रामीण नळपाणीपुरवठा योजनेमध्ये १ लाख २५ हजार ५१० व्यक्तींना ७० लिटर्स प्रतिदिन पाणी शहरामध्ये तर ४० लिटर्स प्रतिदिन पाणी दरडोई वाटपाचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा केला जातो. ८ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठाही या योजनेतून केला जात आहे. सध्या पालघर नगापालिका क्षेत्रातील पालघर, वेवुर, घोलवीरा, टेंभोडे, नवली, लोकमान्यनगर, गोठणपुर, अल्याळी, अशा आठ गावासह सातपाटी, शिरगाव, कोळगाव, धनसार, दापोली, उमरोळी, वरखुंटी, कमारे, पडघे, वागुळसार, पंचाळी, हरणवाडी इ. २० गावांना सध्या सुर्यानदीवरील मासवण बंधाऱ्याजवळून पाणीपुरवठा केला जात आहे.
दुरुस्ती कधी करणार...
विदर्भ, मराठवाडा येथे पाऊस पडत नसल्याने राज्य दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. अगदी मुंबई, ठाणे, शहरातही पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहीले होते. मध्यंतरी परतीच्या पावसाने थोडा दिलासा दिला असला तरी दररोज होणारी हजारो लिटर्स पाण्याची नासाडी रोखण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून केले जात नाही.
जनावरांची आंघोळ, हातपाय धुणे, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात या पाण्याचा वापर सुरू असून या गळक्या व्हॉल्व्हच्या आसपास राहणारे काही लोक हे व्हॉल्व्हचे नट सैल करीत असल्याची शंका पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली जाते. हे गळके व्हाल्व्ह दुरूस्त करण्याची तसदी मात्र घेतली जात नसल्याने लाखो लिटर्स पाणी वाया जाण्याची प्रक्रिया अनेक महिन्यापासून सुरूच राहीली आहे.
६४ लाख ५७ हजाराची थकबाकी
ठाण्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभागाकडून प्रथम योजना तयार करण्यात आल्यानंतर पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा योजना विभागाने ही योजना ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शविल्याने २०११ पासून ही योजना पालघर नगरपरिषद चालवते. या योजनेच्या देखभाल दुरूस्तीपोटी वार्षिक १७९.४१ लाख खर्च अपेक्षीत असताना सातपाटी व्यतिरीक्त इतर १९ गावांकडून वेळीच देखभाल दुरुस्ती खर्च येत नसल्याने ६४ लाख ५७ हजाराची थकबाकी थकल्याचे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हात्रे यांनी सांगितले.