२५४ कामगारांना मिळणार किमान वेतन
By Admin | Updated: May 13, 2017 00:44 IST2017-05-13T00:44:06+5:302017-05-13T00:44:06+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील

२५४ कामगारांना मिळणार किमान वेतन
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील २५४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेतल्यानंतरही तुटपुंजा पगार मिळत होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत या सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन सुरू करावे, अशी सूचना केली. त्याची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याचे लेखी आदेश दिले.
त्यासंदर्भात गुरुवारी मुंबईत चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. त्या वेळी या कामगारांना मिळणारे सध्याचे वेतन हे तुटपुंजे आहे. वाढत्या महागाईसमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे, असे चव्हाण यांनी सहायक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार, त्यांनीही वस्तुस्थितीचा अभ्यास करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना कामगार कायद्याच्या अधिकाराचा भंग करू नका, असे खडे बोल सुनावले.
तसेच या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत किमान वेतन का मिळाले नाही, असा सवाल करत संबंधितांवर कामगार कायद्याचा भंग केला म्हणून फौजदारी गुन्हे दाखल का करू नये, असा सवाल केला. तसेच कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही लेखी आदेश दिले. तसे पत्र केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांना तातडीने पाठवण्यात आले.