वीजपुरवठ्यासाठी २०२ कोटींची सुविधा!
By Admin | Updated: September 9, 2016 02:52 IST2016-09-09T02:52:32+5:302016-09-09T02:52:32+5:30
जिल्ह्यातील महापालिकांचा शहरी भाग व आदिवासी दुर्गम क्षेत्रातील विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण लवकरच करण्यात येणार आहे.

वीजपुरवठ्यासाठी २०२ कोटींची सुविधा!
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्यातील महापालिकांचा शहरी भाग व आदिवासी दुर्गम क्षेत्रातील विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण लवकरच करण्यात येणार आहे. या कामांसाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनेद्वारे २०२ कोटीरुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उघड झाले.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका क्षेत्रासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) लागू केलेली आहे. या योजनेद्वारे शहरांमधील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध स्वरूपाची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ठिकठिकाणी नवीन स्विचिंग स्टेशन उभारणे, नवीन उच्चदाब व लघुदाब वाहिनी सुरू करणे, आधीच्या वाहिनीची क्षमता विस्तारीकरण, नवीन रोहित्र, जुन्या रोहित्राची क्षमता वाढ, पोलवरून जाणाऱ्या वाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करणे आदी कामे हाती घेण्याचे निश्चित केलेले आहे.
या कामांसाठी संबंधित महापालिका व नगरपालिकांसाठी १६२.५४ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचे खासदार व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत महावितरणच्या कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय राठोड यांनी सांगितले. याप्रमाणेच ग्रामीण, आदिवासी भागासाठी लागू केलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी तालुक्यांच्या लागू आहे. या तालुक्यांमधील गावांमधील पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता ही योजना लागू आहे. याद्वारे शहापूर तालुक्यात नवीन उच्चदाब वाहिनी १६ किमी, नवीन वितरण रोहित्रे १२ आणि १०७ किमीची लघुदाब वाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी सात कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात २२/२२ केव्हीच्या स्विचिंग स्टेशनच्या कामांप्रमाणेच अन्यही कामांसाठी १२ कोटी ६८ लाखांचा निधी, तर कल्याणसाठी १६ कोटी २० लाख, भिवंडीसाठी दोन कोटी ४९ लाखांचा निधी विविध कामांसाठी निश्चित करण्यात आला आहे.