२७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

By Admin | Updated: April 25, 2017 00:08 IST2017-04-25T00:08:19+5:302017-04-25T00:08:19+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत.

2 thousand illegal constructions in 27 villages | २७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

२७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत. त्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन हे बघ्याची भूमिका घेतात. या बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, त्यास न्याय न मिळाल्याने ‘रवींद्रन भगावो, तुकाराम मुंढे आओ’ अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेली आहे.
२७ गावांमधील दोन हजार बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. मंत्रालयात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात त्यांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. बेकायदा बांधकामे हटवण्यावर ठामपणे भूमिका घेणारे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचीच रवींद्रन यांच्या जागी नियुक्ती करावी, असे साकडे घालणार असल्याचे गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आयुक्त रवींद्रन हे गोडगोड बोलतात, पण ठोस कार्यवाही करण्याबाबत त्यांचे धोरण मुळमुळीत आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात असेल, तर त्या धोरणाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला.
आशेळे, द्वारली गावांतील बेकायदा बांधकामे वेळोवेळी आयुक्त तसेच प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे गायकवाड म्हणाले. यापैकी एका ठिकाणी १२ माळ्यांचे टॉवर कोणाच्या कृपाशीर्वादाने उभे राहते, असा सवाल केला. प्रभाग अधिकाऱ्यांचा यामध्ये पुढाकार जास्त असतो. त्यांच्या संगनमताशिवाय कुठेही बेकायदा बांधकामे उभीच राहू शकत नाही, असे ते म्हणाले. आरक्षित जागेवरील अतिक्रमण पाडले, असे उदाहरण निदान या शहरांत नाही. त्यामुळे मुंढे यांच्यासारखे अधिकारीच येथे हवेत, असा पुनरुच्चार आमदार गायकवाड यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: 2 thousand illegal constructions in 27 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.