तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य ताब्यात घेतले आहे आणि मोबाईलच्या बॅटरीने माणसाचा मूड. यात कहर म्हणजे आता तर लोकांचे डोकेही मोबाईलच्या बॅटरीनुसार काम करू लागले आहे. लंडन विद्यापीठाच्या मार्केटिंग रिसर्चर थॉमस रॉबिन्सन आणि फिनलंडच्या अल्टो विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे.
आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. काही जणांना तर गेम मुळे वेड लागायची वेळ आली आहे. नुकताच कोल्हापुरात एक मुलगा असंबद्ध बडबडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच स्मार्टफोनची बॅटरी लोकांचा मूड कसा असेल हे सांगत नाही तर ठरवत आहे.
ज्या लोकांचा फोन फूल चार्ज असतो ते लोक सकारात्मक मनस्थितीत राहतात आणि विचार करतात की आता ते कुठेही जाऊ शकतात. तर 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी बॅटरी शिल्लक असलेल्या लोकांमध्ये नकारात्मकता वाढते. या अभ्यासामध्ये सहभागी लोकांना विचारण्यात आले की, दिवस संपायला आल्यावर मोबाईलच्या बॅटरीचा आयकॉन पाहायला कसा वाटतो. त्यांनी सांगितले, फुल बॅटरी पाहणे सुखावह, 50 टक्के बॅटरी चिंताजनक आणि 30 टक्क्यांवर आल्यास ही चिंता आणखी वाढत जाते.
ज्या लोकांची फोनची बॅटरी चार्ज नसते ते दुसऱ्यांवर जास्त अवलंबून असतात, त्यांचा समाजातील प्रभावही कमी असतो. त्यांना त्यांच्या आयुष्याचे नियोजन करण्यातही संकटे येत असतात, असे अहवारालात म्हटले आहे.