5G नंतर आता भारतात 6G ची तयारी सुरू; केंद्रीय मंत्र्यांनी थेट लॉन्चिंगची तारीख सांगितली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:03 IST2025-03-31T18:01:59+5:302025-03-31T18:03:04+5:30
5G नंतर भारतात 6G सेवेची वेगाने तयारी सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्येच इंडिया 6G मिशन लॉन्च केले होते.

5G नंतर आता भारतात 6G ची तयारी सुरू; केंद्रीय मंत्र्यांनी थेट लॉन्चिंगची तारीख सांगितली...
6G in India : जगभरातील अनेक देशांमध्ये अद्याप 5G सेवा सुरू झाली नाही, पण भारताने 6G च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सरकारने 6G तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी एक टेस्ट बेड अनेक वर्षांपूर्वी तयार केला आहे. यासाठी इंडिया 6G मिशनही सुरू केले आहे. 5G प्रमाणे भारत 6G लॉन्च करणाऱ्या जगातील पहिल्या देशांपैकी एक असेल. दरम्यान, भारतात 6G कधी सुरू होणार, याबाबत केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी महत्वाची माहिती दिली.
देशभरात 5G चे जाळे
2022 मध्ये भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षात भारतभर 5G नेटवर्क बसवण्यात आले. देशातील 750 पैकी 98 टक्के जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आहे. Airtel आणि Jio नंतर Vi ने देखील आपली 5G सेवा लॉन्च केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL देखील या वर्षी जूनमध्ये आपली 5G सेवा सुरू करणार आहे.
2030 मध्ये 6G लॉन्च होणार
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी एका कार्यक्रमात म्हणाले, भारत 6G मिशन अंतर्गत, आम्ही 2030 पर्यंत 6G सेवा आणण्याची तयारी करत आहोत. आम्ही नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेश टेक्नॉलॉजी डिझाईन, डेव्हलपमेंट आणि डिप्लॉयमेंटमध्ये अग्रेसर असू. आम्ही भारताला दूरसंचार निर्यात केंद्र बनवण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. आम्ही केवळ सेमीकंडक्टर आणि नेटवर्क उपकरणे वापरण्यावरच काम करणार नाही, तर त्यांची निर्मितीही करणार आहोत. आम्हाला भारताला Ai आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये अग्रेसर बनवायचे आहे."
“We aim to be the frontline contributor in design, development and deployment of 6G technology by 2030” - Union Telecom Minister of State Dr. @PemmasaniOnXpic.twitter.com/34EBZr8y2B
— DoT India (@DoT_India) March 29, 2025
दूरसंचार विभागाने (DoT) राज्यमंत्र्यांचे हे विधान त्यांच्या अधिकृत X हँडलवरून शेअर केले आहे. भारतात 6G विकसित करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने यासाठी इंडिया 6G मिशनची घोषणा केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सार्वजनिक मंचांवर 6G मिशनचा अनेकदा उल्लेख केला आहे.