Solapur Crime:सोलापूरातून हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सोलापुरात एकाच घरात तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. स्कार्फच्या साहाय्याने स्लॅब हुकाला तरुण-तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कर्णिकनगर येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रोहित भिमू ठणकेदार (२३), अश्विनी विरेश केशापुरे (२३) अशी त्यांची नावे आहेत. समवयस्क असलेल्या दोघांच्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरात तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. एकाच स्कार्फला दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात 'आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका' असं म्हटलं आहे. ही चिठ्ठी मुलीने लिहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आक्रोश करत रुग्णालयाकडे धाव घेतली.
रोहित हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो बुधवारी कामावर गेला होता. गुरुवारी सकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला. संध्याकाळपर्यंत तो न आल्याने मालकाने त्याच्या कर्णिकनगर येथील घरी जाऊन पाहिलं. रोहितच्या मालकाला घराच्या पहिल्या मजल्यावरील उघड्या रूममध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी ती चिठ्ठी सापडली.
अश्विनीचे फार्मसीचे शिक्षण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून मामाकडे बागलकोट येथे राहत होती. बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती. गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असे सांगून ती निघून गेली, पण ती मामाकडे गेलीच नाही. यामुळे तिचा शोध आई-वडील घेत होते. या घटनेनंतर संध्याकाळी अश्विनीच्या घरच्यांना एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली. कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. जिल्हा रुग्णालयामध्ये दोघांच्या पालकांनी आक्रोश केला.
भाऊ म्हणून करुन दिली होती ओळख
अश्विनीला घरात लाडाने स्वाती म्हणत होते. काल आमच्या सोबत स्वाती बोलत बसली होती, आता तू कुठं गेली म्हणत अश्विनीच्या आईने हंबरडा फोडला. पोलिसांनी अश्विनीची मोबाईल जप्त केला आहे. रोहित हा अश्विनीच्या घरी येत होता. तेव्हा अश्विनीने त्याची ओळख भाऊ म्हणून करुन दिली होती. हा माझा भाऊ आहे, असं तिने कुटुंबियांना सांगितले होते. तो आठवड्याभरापूर्वीच घरात येऊन गेला, अशी माहिती अश्विनीच्या काकांनी दिली.दरम्यान, स्वातीने लिहिलेल्या दीड पानांच्या चिठ्ठीत 'मी गेल्यावर तुम्ही खुश व्हाल' असेही म्हटलं आहे.
दरम्यान, दोघेही सोशल मीडियाच्या अकाऊंटवर स्टेटस ठेवायचे. आदल्या दिवशी 'दादा तू माझ्यासाठी मानलेला भाऊ नाही रे, तू माझ्या सख्या भावापेक्षा जास्त आहेस' असे स्टेटस ठेवलं होतं. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये 'माँ है तो मुमकिन हैं, शहंशाह होना, माँ के आचल से बड़ा दुनिया मे कोई साम्राज्य नहीं' असे म्हटलं होतं. तसेच मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. रोहितचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा असल्याचे गाडे याने पोलिसांना सांगितले. त्याउलट त्याचे लग्नच झाले नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले.