Solapur News: सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंमुळेकाँग्रेसची कामगिरी सोलापूर महापालिका निवडणुकीत कशी राहील याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस सपाटून आपटली आहे. दोन उमेदवारच विजयी झाले. त्यावरून आता कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना दोन नगरसेवक सांभाळण्याचा इशारा दिला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक निकालानंतर बोलताना जयकुमार गोरे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असे म्हटले होते. या सगळ्यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, "मी काँग्रेसचा होतो, हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेंच्या प्रमाणपत्राची गरज गरज नाही. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केले."
"आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे यांनी सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे प्रणिती शिंदे यांनी केले. ज्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती, त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. त्यामुळे दोन नगरसेवक आल्यावर देखील समाधान वाटत आहे", अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना सुनावले.
दुसऱ्याचा सन्मान करा, तेव्हाच तुमचा सन्मान होईल
जयकुमार गोरे म्हणाले, "८७ नगरसेवक जिंकलेल्या भाजपावर त्या टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारण नाहीये. एवढा मोठा पराभव झाला तर ते स्वीकारायला हवे. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटले आहे. त्या सन्मानाने बोलल्या का?", असा सवाल गोरेंनी शिंदेंना केला.
"तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करा मग तुमचाही सन्मान होईल. आपण लोकसभेला कुठे-कुठे चर्चा केल्या होत्या, हे सांगायला मला भाग पाडू नका. मी संधीसाधू आहे की नाही, हे भाजपाला चांगले माहिती आहे. मी जिथे आहे, तिथे चांगले काम करतो. ताईंनी आत्मपरीक्षण करावे. कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता, बघा आपले घर आणि अवस्था काय झाली आहे. दोन नगरसेवक आले आहेत. त्यांना आधी सांभाळून ठेवा", असा इशाराही गोरे यांनी प्रणिती शिंदेंना दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीमुळे पुन्हा तापले राजकारण
महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
गोरे निवडणुकीबद्दल बोलताना म्हणाले, "जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्याचे आमचे उद्दिष्टे आहे. सांगोल्यात आम्ही आणि शहाजी बापू समविचारी आहोत. आम्ही सोबत लढू. शेकापला सोबत घेण्याबद्दल खूप चर्चा होत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, दहा मिनिटांनी काय होईल, हे सांगता येत नाही", असेही ते बोलले.