ऊसदरही नाही अन् आंदोलनही!
By Admin | Updated: November 25, 2014 00:39 IST2014-11-25T00:34:26+5:302014-11-25T00:39:04+5:30
हंगाम मात्र जोमात : राज्यातील १३८ कारखाने झाले सुरू

ऊसदरही नाही अन् आंदोलनही!
कोल्हापूर : यंदाच्या ऊस हंगामात कारखान्यांनी उसाला पहिली उचल किती द्यावी, याचा निर्णय ऊसदर मंडळाने जाहीर केला असला तरी तेवढे पैसे द्यायचे कोठून? हा कारखानदारांसमोर प्रश्न आहे. राज्य व केंद्र शासन काहीतरी करेल म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आंदोलन आणखी पंधरा दिवस पुढे ढकलल्याने आंदोलनही नाही व ऊसदरही, अशी आजची यावर्षीच्या हंगामातील स्थिती आहे. राज्यातील तब्बल १३८ कारखान्यांची धुराडी पेटली असून, हंगाम जोमाने सुरू झाला आहे. शासनाच्या अंदाजानुसार आणखी किमान २० कारखाने नोव्हेंबरअखेर सुरू होऊ शकतील.
गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटल्याने हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला होता. परंतु, यंदा संघटनेने सरकारला मुदत द्यायची म्हणून आंदोलन सुरू केले नाही. त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. खासदार राजू शेट्टी यांनी ती काल, रविवारीच पुन्हा वाढवून दिली. त्यामुळे यंदाच्या हंगामात आता यानंतर ऊसदरासाठी आंदोलन होण्याची शक्यता नाही. रघुनाथदादा पाटील हे शेट्टी आंदोलन न करता शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीका करत आहेत. परंतु, स्वत: रघुनाथदादांची स्वतंत्र आंदोलन करण्याची ताकद नाही. शिवसेना सत्तेत जाणार की नाही, या संभ्रमावस्थेत असल्याने ती यंदा आंदोलनात उतरलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे चांगले देण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास यंदा तरी कुणी तयार नाही.
राज्य सरकारने ऊसदर मंडळाची बैठक घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. परंतु, त्यांनी जाहीर केलेली एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना केंद्र शासनाने बिनव्याजी मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.
मात्र, पंतप्रधान विदेश दौैऱ्यावरून आल्यानंतर जम्मू-काश्मीर व झारखंड येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यावर गेले. त्यामुळे ही
बैठक होऊ शकलेली नाही. त्यांची
भेट झाल्याशिवाय यातील गुंता सुटणार नाही. त्यामुळे प्रतीक्षा करण्याशिवाय शेतकरी व संघटनेच्याही हातात काहीच राहिलेले नाही.
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातही विभागांतील ८२ सहकारी व ५६ खासगी कारखाने कालअखेर सुरू झाले. त्यांनी ८१ लाख ९७ हजार टनाचे गाळप केले असून, ७४ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.०९ इतका आहे. परतीचा पाऊस झाल्याने यंदा अजूनही उतारा दहाच्या आतच अडकला आहे.
दृष्टिक्षेपात हंगाम (२३ नोव्हेंबरपर्यंत)
विभागहंगाम सुरू गाळपसाखर उत्पा.उतारा
(कंसात खासगी)
४कोल्हापूर२१ (०५)१२.०२१०.८३९.०१
४पुणे२७(२२)४१.४८४०.१३०९.६८
४अहमदनगर१३(०६)०९.३००८.२१०८.८३
४औरंगाबाद१० (०७)०७.०००५.१४०७.३४
४नांदेड११(१४)११.७७०९.९५०८.४५
४अमरावती००(०१)००.२९००.२१०७.११
४नागपूर००(०१)००.११००.०५०४.४४
एकूण८२ (५६)८१.९७७४.५२०९.०९
मागील हंगाम६१ (३५)४०.०८३४.२४०८.५४
(*गाळप लाख टन, साखर उत्पदन लाख क्विंटल, उतारा टक्के)