वीजपुरवठा काही केल्या सुधारेना
By Admin | Updated: November 18, 2014 14:53 IST2014-11-18T14:53:21+5:302014-11-18T14:53:21+5:30
मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही.

वीजपुरवठा काही केल्या सुधारेना
सोलापूर : मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. विहिरीत पाणी असूनही सर्वच पिके उभ्या-उभ्याच माना टाकू लागल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे.
कोणीच विचारणा करीत नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा होत नाही. अधिकार्यांपासून कर्मचार्यांपर्यंत टोपली टाकण्याचे काम सुरू आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. यामुळेच कौठाळी, कळमण, साखरेवाडी,पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ, अकोलेकाटी व इतर गावांतील शेतकरी वैतागले आहेत. सकाळी सव्वाआठ व रात्री साडेबारा या दोन सत्रात अकोलेकाटी उपकेंद्रातील गावांना शेतीपंपासाठी(थ्रीफेज) वीज पुरवठा सुरू केला जातो. रात्री साडेबारा वाजता येणारी वीज सकाळी सव्वाआठपर्यंत कागदोपत्री ठेवली जात असली तरी ती काही मिनिटेही सुरळीत मिळत नाही. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार सव्वाआठ वाजेपर्यंत वीज ठेवतो असे सांगितले जात असले तरी शेतीपंपांना काही तासही वीज मिळत नाही. दिवसभराच्या कामाने कंटाळलेला शेतकरी असा झोपी जातो तोच साडेबारा वाजल्याने मोटारी सुरू करण्यासाठी उठावे लागते. मध्यरात्रीच्या वेळी अशी मोटार सुरू केली की वीज गायब झालेली असते. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झालेला असतो . कमी दाबाने वीज पुरवठा होतो किंवा वीज गायब होत असल्याने मोटारीच सुरू होत नाहीत. अकोलेकाटी सबस्टेशनला फोन केला तर फोन उचलण्यासाठीही कोणी व्यक्ती नसते. अधिकार्यांना फोन करायची तर सोयच नाही. अशा अवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. असलेल्या पाण्यावर पिके घेण्याचा प्रयत्न केला असता वीज मंडळाकडून पुरेशा दाबाने व आठ तासही वीज मिळत नसल्याने पिके उभ्या-उभ्याच करपू लागली आहेत. (प्रतिनिधी)
लाईनमन असतात कुठे
■ कार्यकारी अभियंता म्हणून ए.ए. पठाण असताना त्यांना शेतकरी रात्री-अपरात्री मोबाईल करुन वीज पुरवठय़ाच्या तक्रारी करीत असत. उपअभियंता स्वामी हेही रात्रीच्या वेळी मोबाईल केला तरी अडचण सोडवायचा प्रयत्न करीत असत. सध्या कोणीच दखल घेणारे नसल्याने गावपातळीवरचे लाईनमनही शेतकर्यांची दखल घेत नाहीत.
बिले भरणार्यांना शिक्षा
■ मागील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी गारपीटग्रस्तांच्या यादीत नावे असलेल्यांची जानेवारी ते जून या कालावधीची शेतीपंपांची दोन बिले माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचा लाभ उत्तर तालुक्यातील शेतकर्यांना मिळाला नाही. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर सरसकट बिल भरले तरच नव्याने ट्रान्स्फॉर्मर दिला जातो. म्हणजे बिले भरुनही वीज काही मिळत नाही.