बार्शीतील आठ दुकाने फोडणाऱ्या चौघांना मुंबईत पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:37+5:302021-09-02T04:47:37+5:30
बार्शी : बार्शी शहरात चार दिवसांपूर्वी विविध भागातील व्यवसाय करणाऱ्या आठ दुकानाची बंद शटर्स तोडून चोरट्यांनी त्यातील साहित्यासह रोख ...

बार्शीतील आठ दुकाने फोडणाऱ्या चौघांना मुंबईत पकडले
बार्शी : बार्शी शहरात चार दिवसांपूर्वी विविध भागातील व्यवसाय करणाऱ्या आठ दुकानाची बंद शटर्स तोडून चोरट्यांनी त्यातील साहित्यासह रोख २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी ४८ तासात तपास करून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्या चौघांना बार्शी न्यायालयात न्यायमुर्ती.आर. एस. धडके यांच्या समोर हजर केले असता, त्यांना ३ सप्टेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे.
मारुती चंद्रशेखर दासर (वय २७), महेंद्र अविनाश पाटील (वय २५), अभिजित गौतम कांबळे (वय २४), अजय अर्जुन कानगुलकर (वय २२, सर्व रा. नवी मुंबई) अशी त्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही चोरीची घटना शुक्रवारी दुकाने बंद करून गेल्यानंतर शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
याबाबत आज सर्वांच्या वतीने गणेश भीमराव कानडे (वय ३९, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. हे आरोपी बार्शीच्या गुन्ह्यात वापरलेल्या कारचा नंबर बदलून वापर करीत होते.
हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील, शहर पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलीस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे यांनी पोलीस पथकांसमवेत नवी मुंबई येथे जाऊन तपास करून अटक केली.
या तपास कामात पोलीस अजित वरपे, अरुण माळी, लक्ष्मण भांगे, ठेंगल, मनीष पवार, ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगीर, अजित गोसावी, विक्रांती लगदिवे, सायबर शाखेचे रतन जाधव आदींनी परिश्रम घेतले.
-----
सराईत गुन्हेगार
नवी मुंबई, ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक कार व रोख रकमेसह २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बारामती, नवी मुंबई, ठाणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती धाराशिवकर यांनी दिली.