अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी; राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:34+5:302021-09-09T04:27:34+5:30

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० मि. मी.पेक्षा ...

Compensation for damage caused by excess rainfall; Rajendra Raut's demand to the Chief Minister | अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी; राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी; राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० मि. मी.पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील शेती उपकरणे, अवजारे पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर फळबागांची व सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिकांची तसेच कांदा, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझडही झाली आहे.

बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे व संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

बार्शी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून, नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी विनंती आमदार राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार सुनील शेरखाने यांना दिल्या आहेत.

----

Web Title: Compensation for damage caused by excess rainfall; Rajendra Raut's demand to the Chief Minister