केंद्राचं पथक सोलापुरात; सकाळपासूनच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 5, 2025 10:26 IST2025-11-05T10:25:01+5:302025-11-05T10:26:46+5:30
नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक पाहणी करण्यासाठी सोलापुरात

केंद्राचं पथक सोलापुरात; सकाळपासूनच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये जवळपास सात तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक आज पाहणी करण्यासाठी सोलापुरात आले. बुधवारी सकाळपासूनच या पथकाने सोलापूर येथून वडकबाळ, हत्तुर, तिऱ्हे, शिवणी व सोलापूर येथील शेती, घरं, रस्ते, महावितरणचे उपकेंद्र तसेच बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
केंद्रीय पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.
पथकाने हिरज, हत्तूर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.