मुंबई – जगासह संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. गेल्या वर्षीच्या लाटेपेक्षा ही लाट भयंकर असून यात लोक वेगाने संक्रमित होत आहेत. बेड्स, ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांच्या मनात भीती घातल्याचे प्रकारही घडत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजचा मजकूर तसाच ठेवला जातो आणि विभागाची नावं बदलली जात आहेत. सोशल मीडियात लिहिलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलं आहे याबाबत पाहूया.
लवकरच कोरोना तिसरी लाट येणार आहे. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :
*शेजारी जाणे बंद
*गरम पाणी पिणे
*ब्रेड पाव बेकरी सामान बंद
*बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये.
आणखी सविस्तर
१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुवून घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुवून घ्या.
२. वृत्तपत्रे बंद करा, नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.
३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.
४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.
५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.
६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.
७. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बसने प्रवास करणे टाळावे
८. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी घरून काम करावे
९. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुवून घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुवून घ्या आणि मगच वापरा/खा.
१०. झोमॅटो, स्विग्गीवरून जेवण घेणं बंद करा.
११. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे, बाहेर जाताना मास्क लावणे याची सगळ्यांनाच सवय लावणे.
१२. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.
१४. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग वेगळे ठेवावे.
१४. कपड्याना इस्त्री घरीच करा.
१५. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजार-यांशी गप्पा करणे वगैरे प्रकार टाळा.
१६. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले की पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या
स्वतःची काळजी घ्या, बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..
जिल्हा माहिती कार्यालय, मुंबई
अशा प्रकारचा हा मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहे. परंतु अशी कोणतीही सूचना न दिल्याचा खुलासा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. कोरोना काळात मास्क वापरणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं हे गरजेचे आहे. परंतु अशाप्रकारे चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.