मोदीच काय, कोणीही संविधान बदलणे अशक्य

By Admin | Updated: April 11, 2016 00:53 IST2016-04-10T23:32:05+5:302016-04-11T00:53:04+5:30

रामदास आठवले : दलितांवर अजूनही अत्याचार

What Modi is, no one can change the constitution | मोदीच काय, कोणीही संविधान बदलणे अशक्य

मोदीच काय, कोणीही संविधान बदलणे अशक्य

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी संविधान बदलणार ही चर्चा वायफळ आहे. मोदीच काय कोणीही संविधान बदलू शकत नाही. ते बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जनता सत्तेवर ठेवणार नाही. संविधान बदलणार नाही, तुम्हाला बदलावे लागेल, असे प्रतिपादन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून वेगळ्या मराठवाड्याची मागणी रास्त नाही, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मधु मोहिते, प्रि. आर. एल. तांबे, जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, रमाकांत जाधव, तानाजी कांबळे, जिल्हा संघटक दादा मचंर्डे, अनंत पवार, महेंद्र्र शिर्के आदी उपस्थित होते.
भारत भीमयात्रेच्या निमित्ताने खासदार आठवले कणकवलीत आले होते. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर जन्मशताब्दीचे औचित्य साधून निघालेला समता रथ १ मे रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जन्मगावी महू येथे पोहोचेल.
जाती तोडो समाज जोडो अभियानातून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु दलितांवर अजूनही अत्याचार होत आहेत. काही घटकांना अजूनही दलितांची प्रगती होऊ नये असे वाटते. बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले की, परिवर्तन वाढेल. सर्व राज्यांतील सरकारना आमचे आवाहन आहे की, ज्या जिल्ह्यात सर्वांत जास्त आंतरजातीय विवाह होतील त्याला २५ कोटी रुपये द्यावेत, दाम्पत्याला ५ लाख रुपये आणि त्यापैकी एकाला सरकारी नोकरी द्यावी.
नक्षलवादी चळवळीचा त्याग आकर्षित करणारा आहे; परंतु त्यांनी स्वीकारलेला हिंसेचा मार्ग दलितांना न्याय देणारा नाही. त्यांनी नक्षलवाद सोडून लोकशाहीचा आंबेडकर वाद स्वीकारवा. ही सत्ता नको असेल तर सत्ता बदलावी, पण हिंसक मार्गाने गरिबांना न्याय मिळणार नाही. लोकशाही मार्गानेच मिळेल.
आमचा पक्ष महायुतीमध्ये असला तरी आम्ही त्यांच्या सगळ्या मतांशी सहमत नाही. आमचा पक्ष ज्यांच्या बाजूने त्यांची सत्ता येते, असा २0 वर्षांचा अनुभव आहे. उद्धव ठाकरे यांची एकला चलो रे ही हाक शिवसेनेला मजबूत करण्यासाठी होती. याचा अर्थ ते महायुती तोडणार नाहीत. मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगळे लढल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. (प्रतिनिधी)

विदर्भाला पाठिंबा
संयुक्त महाराष्ट्रानंतर विदर्भावर अन्याय झाला आहे. या भागाचा विकास झाला असता, तर वेगळ्या राज्याची मागणी करावी लागली नसती, पण वेगळे मराठवाडा व्हावे, अशी आमची मागणी नाही.


त्यांनी देश सोडावा
भारतवासीयांनी ‘भारत माता की जय’ म्हटलेच पाहिजे. ज्यांना हे मान्य नाही ते देशद्र्रोही असून त्यांनी भारताबाहेर जावे, असे खासदार आठवले म्हणाले.

Web Title: What Modi is, no one can change the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.