उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थितीची शून्य जाण !, नारायण राणे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:16 IST2020-10-19T13:14:09+5:302020-10-19T13:16:00+5:30
Narayan Rane, Uddhav Thackeray, sindhudurg उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. अशी टीका करतानाच त्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे. ते आता अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन काय साधणार आहेत ? असा सवालही भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थितीची शून्य जाण !, नारायण राणे यांची टीका
कणकवली : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. अशी टीका करतानाच त्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे. ते आता अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन काय साधणार आहेत ? असा सवालही भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे कणकवली येथे रविवारी उद्यानाच्या कामाच्या भूमीपूजनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले , उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली होती. यानंतर ते इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यातील प्रमुख नेते अशाप्रकारे सक्रिय झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सोलापूरचा दौरा घोषित केल्याची शक्यता आहे. ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.