चुरस अचानक नाहीशी झाली अन्....
By Admin | Updated: October 19, 2014 22:59 IST2014-10-19T22:30:46+5:302014-10-19T22:59:52+5:30
शेवटपर्यंत शिवसैनिकच राहीन : उदय सामंत

चुरस अचानक नाहीशी झाली अन्....
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात यावेळी सेना-भाजपत न भुतो न भविष्यती अशी चुरस निर्माण झाली होती. मतदानाच्या आधी दोन दिवसांपर्यंत ही चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर चुरस असल्याचे केवळ वातावरण राहिले. पडद्यामागे असंख्य घडामोडी झाल्या. भाजपच्या घराचे काही वासे फिरले अन चित्रातील रंग बदलले. त्याचवेळी निवडणूक एकतर्फी होणार असल्याच्या काही रंगीत रेघा निवडणुकीच्या चित्राबाहेर डोकावल्या, अन या मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीत मावळलेल्या ग्रहाचा शिवसेनेत ‘उदय’ झाला.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात काय होणार, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांना राष्ट्रवादीतील नाराजीची, असंतोषाची धग बसणार की, सामंतांना शिवसैनिक स्वीकारणार, त्यांच्या विजयाची हट्ॅट्रिक होणार, असे सवाल केले जात होते. सुरूवातीला सामंत यांना सेना नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही नाराजीला सामोरे जावे लागले. मात्र, सामंत व त्यांच्या कुटुंबीयांनी ही नाराजी कुशलतेने दूर करण्यात अखेर यश मिळविले, हेच आजच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळेच चुरशीचे वातावरण संपुष्टात आले व उदय सामंत यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय नोंदविला. ज्याप्रमाणे त्यांनी रत्नागिरी मतदारसंघाचा पहिला आमदार मंत्री झाल्याचा इतिहास निर्माण केला. त्याचप्रमाणे रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार म्हणूनही राजकीय पटलावर नाव कोरले आहे.
राष्ट्रवादीने दोन वेळा आमदारकी, दीड वर्ष मंत्रिपद व तिसऱ्यांदा उमेदवारीचा एबी फॉर्म दिलेला असतानाही सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून खळबळ उडवून दिली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतही तीव्र नाराजी होती. सामंत यांनी प्रवेश केलेल्या शिवसेनेतही प्रथम असंतोष खदखदू लागला. जिल्हा परिषदेच्या तटावरही बंडाची तुतारी घुमू लागली. या सर्वांच्या नाकदुऱ्या काढणे सोपे नव्हते. त्यामुळे सामंत यांचा हा विजय एकतर्फी दिसत असला तरी सहज सोपा नाही. त्यासाठी त्यांना दर सेकंदागणिक संघर्ष करावा लागला हे विसरून चालणार नाही. राष्ट्रवादीत असताना आमदार व नंतर पालकमंत्री म्हणून केलेली कामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. परंतु त्यांनी बदललेला पक्ष हा राष्ट्रवादी व सेना कार्यकत्याच्याही पचनी पडला नव्हता. त्यामुळे काहीजणांच्या पोटात मळमळू लागले. त्यावर सामंत यांना ‘बहुमोल’ उपचार करावा लागला. त्यातूनच त्यांचे ‘फॉर्च्युन’ ठळक झाले. त्यांच्या विजयाने सेनेतील अनेक कार्यकर्तेही दिवाळीआधीच उजळून निघाले. १९ आॅक्टोबरला सामंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळ माने (भाजप) यांच्यावर ३९३२७ मताधिक्याने विजय मिळविला. सेनाप्रवेशानंतर प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी निवडणुकीच्या आधी काही काळ स्वत:साठी अनुकूल कशी बनविली, यामागील ‘राज’ मात्र कायम आहे.
रत्नागिरी मतदारसंघातील ही निवडणूक मुळातच चौरंगी होती. परंतु राष्ट्रवादीत पडलेली फूट व कॉँग्रेसची अपुरी असलेली ताकद यामुळे सेना-भाजप या आधीच्या मित्रपक्षातच ही दुरंगी लढत रंगली. उदय सामंत यांच्याशी सलग तिसऱ्या वेळी सामना करताना विजय व्हावा व आधीच्या दोन वेळचा पराभव धुवून काढताना पराभवाची हॅट्ट्रिक टाळता यावी, यासाठी भाजपचे उमेदवार बाळ माने यांनी आटोकाट प्रयत्न केले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नितीन गडकरी यांच्याही सभा या मतदार संघात घेतल्या. त्यातून एक वातावरण भाजपच्या बाजूने तयार झाले. परंतु हे वातावरण अगरबत्तीच्या धुराप्रमाणे तत्कालिक ठरले. निवडणूक मतदानाच्या आधी निर्माण झालेला हा धूर अगरबत्ती पेटून गेल्यानंतर विरून गेला व अगरबत्तीच्या मुळाशी काड्या तेवढ्या उरल्या, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. काय झाले, कसे घडले, कोण फितूर झाले, कोणाला लॉटरी लागली, शहरात काही स्वकियांनीच दगा दिला काय, संघाचे कार्यकर्ते माने यांच्या प्रचारासाठी फिरूनही त्याचा उपयोग झाला नाही काय, यांसारख्या मुद्द्यांवरच पराभवानंतरचा खल सुरू झाला आहे. सामंत यांनी अचानकपणे कोणतेही पटणारे कारण नसताना राष्ट्रवादी सोडून सेनेत प्रवेश केल्याने त्यांना गद्दार ही उपाधी भाजपने दिली. रत्नागिरीतील लढाई ही ‘गद्दार विरूध्द निष्ठावंत’ या मुद्द्यावर लढली गेली. मुलूखमैदान तोफ म्हणून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनीही सामंत यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. सामंत यांना गनिमी काव्याने चितपट करण्याचे सर्व प्रयत्न करूनही भाजपला ही जागा सलग तिसऱ्यांदा गमवावी लागली. त्यामुळे सामंत यांनी अशी कोणती जादू केली की, त्यामुळे भाजपची सर्वच अस्त्र निष्प्रभ ठरली, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या संघटन कौशल्यामुळे तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. त्यातीलही काही बुरुज ढासळविण्यात भाजपला यश आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्या बुुरुजांची ‘मोला’ची डागडुजीही सेनेकडून झाली.
रत्नागिरी शहरातून भाजपला मताधिक्य मिळण्याची मोठी अपेक्षा होती. किमान ६ ते ७ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा शहरातील भाजप नेते करीत होते. परंतु त्यांचे अंदाज चुकले की, अखेरच्या क्षणी फितुरी झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी माने यांच्या या तिसऱ्या पराभवाची कारणमीमांसा करतीलच. परंतु आधीच्या दोन पराभवानंतर केलेल्या कारणमीमांसेचे काय झाले, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. ही निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यानंतर सर्वच पक्षांना आपण किती पाण्यात आहोत, याची प्रचिती या निमित्ताने आली आहे.
शेवटपर्यंत शिवसैनिकच राहीन : उदय सामंत
माझ्याविरोधात कटकारस्थाने करणाऱ्या विरोधकांना मतदारांनी, माझ्या समर्थकांनी मला प्रचंड मतांनी विजयी करून चोख उत्तर दिले आहे. गद्दारीचा मुद्दा पुढे करून मतदारांसमोर जाणाऱ्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. माझा विजय हा ऐतिहासिक आहे. राजकारणात आहे, तोपर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहीन. विकासकामे पुन्हा नव्या जोमाने पूर्ण करण्यासाठी कटिबध्द आहे, अशी प्रतिक्रिया सेनेचे विजयी उमेदवार उदय सामंत यांनी दिली.
कार्यरत राहणार : माने
ंमतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आपण निश्चितपणे मतदारांसमोर चांगल्या पध्दतीने सामोरे गेलो होतो. पराभवाने आतापर्यंत खचलो नाही, पुढेही खचण्याचे कारण नाही. जनतेची कामे यापुढेही करतच राहणार आहे. विकासकामांना भाजपाच्या माध्यमातून न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रीया दुसऱ्या क्रमांकाचे पराभुत उमेदवार बाळ माने यांनी दिली.
सर्वकाही पणाला :मुर्तुझा
राष्ट्रवादीचा उमेदवारच ऐनवेळी दुसऱ्या पक्षात गेला. त्यामुळे आम्हाला निवडणूक तयारी करण्यास वेळच मिळाला नाही. तरीही राष्ट्रवादीतून सेनेत गेलेल्या सामंतांना सहज विजय मिळालेला नाही. त्यांना सगळ्या गोष्टी पणाला लावाव्या लागल्या, हे लपून राहिलेले नाही. मतदारांचा कौल मान्य असल्याचे बशीर मुर्तुझा म्हणाले.