द्वेष करणाऱ्यांकडून लाडाची अपेक्षा नाही
By Admin | Updated: November 1, 2015 00:12 IST2015-10-31T23:04:02+5:302015-11-01T00:12:03+5:30
परुळेकर : अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा घेतला समाचार

द्वेष करणाऱ्यांकडून लाडाची अपेक्षा नाही
सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन सुरू केल्यामुळेच शासनाच्या तिजोरीतून मानधनाचा निधी बाहेर पडला. गेली अनेक वर्षे ज्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा द्वेषच केला ते आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार? असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
गुरुवारी पार पडलेल्या महिला व बालविकास समिती सभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाविषयीच्या चर्चेत महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी माहिती देताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आॅगस्टपर्यंतचे सर्व मानधन वितरित केले आहे. तरीही जोपर्यंत मानधन खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत मासिक प्रगती अहवाल दिला जाणार नाही, असे संघटनेच्या जोरावर त्यांच्याकडून अडेलतट्टू धोरण अवलंबिले जात आहे, असा आरोप केला. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अती लाड झाले असल्याचेही यावेळी म्हटले होते.
दोन दिवसांत मासिक प्रगती अहवाल सादर न केल्यास कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशाराही यावेळी सभापती स्नेहलता चोरगे यांनी दिला होता.
याबाबत शुक्रवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन पुकारल्यामुळेच शासनाच्या तिजोरीतून मानधनाचा निधी बाहेर पडला.
ज्या अधिकाऱ्यांनी आणि समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गेली अनेक वर्षे द्वेषच केला ते दगडाची हृदये असलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार?
असा प्रश्नही उपस्थित केला आहे. चार महिने मानधन नसतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले घर कसे चालविले याची ज्यांना जाणीव नाही, ते कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार त्यासाठी मुळात प्रेम असावे लागते. त्यामुळे नेहमी द्वेष करणाऱ्यांकडून लाड करण्याची अपेक्षा कोण ठेवेल? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
महिला व बालविकास समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांना वेळेत मानधन कसे मिळेल, दोन वर्षांची प्रवास बिले कशी मिळतील, याकडे लक्ष द्यावे. नाहक कारवाईच्या धमक्या दाखवू नयेत असेही पत्रकातून सूचित केले आहे. (प्रतिनिधी)