कणकवली : कळसुली, लिंगेश्वरनगर (गवसेवाडी) येथील महेश दिनकर देसाई (५२) या शेतकऱ्याचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आपल्या स्वत:च्या शेतीबरोबरच मोलमजुरी करून ते आपला व पत्नीचा उदरनिर्वाह करत असत. त्यांना अपत्य नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. इंदिरा आवास घरकुल योजने अंतर्गत त्यांना घर मिळाले होते. त्यांना गुरे पाळण्याची आवड होती.महेश देसाई यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने तिला मोठा धक्काच बसला आहे.महेश देसाई हे गुरुवारी सकाळी पत्नीसोबत कणकवली येथे बाजारात आले होते. तेथील काम आटोपून ते दोघे कणकवली-कळसुली एस.टी. बसने परत घरी जायला निघाले. कळसुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ते उतरले. तेथून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी जाण्यास निघाले. वाटेतील ओढा ओलांडताना पावसामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात महेश देसाई वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेल्या पत्नीने आरडाओरडा केला. मात्र,जवळपास कोणीच नसल्याने मदत मिळू शकली नाही.ओढ्यात आढळून आलेला तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तसेच शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.देसाई यांना शोधण्यासाठी कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, ग्रामस्थ आनंद देसाई, विजय देसाई, पंढरी देसाई, आत्माराम नार्वेकर, बाळा कदम, पोलिस पाटील महेश केसरकर,निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव,पोलिस हवालदार मिलिंद देसाई आदी नागरिकांनी प्रयत्न केले.
रात्री साडेदहाला आढळला मृतदेहपत्नीने तातडीने गवसेवाडीत धाव घेत तेथील लोकांना या दुर्घटनेबाबत सांगितले तसेच काही नागरिकांनी सरपंच ,पोलिस पाटील, महसूल व पोलिस प्रशासनालाही कळविले. त्यानंतर सर्वजण रात्रीच्या अंधारात महेश देसाई यांचा शोध घेत होते. सुमारे साडेतीन तासानंतर रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह कळसुली, कुमाठ येथील ओहोळाच्या पाण्यात एका झुडुपाला अडकलेल्या स्थितीत आढळून आला.