शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ

By Admin | Updated: November 2, 2014 00:43 IST2014-11-02T00:43:23+5:302014-11-02T00:43:23+5:30

गतवर्षीपेक्षा ५0 टक्केच अर्ज प्राप्त : सन २0१३ नंतरच्या शिक्षकांना अनिवार्य

Text to TET exams of teachers | शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ

शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ

सिंधुदुर्गनगरी : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून एकूण २ हजार २५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत केवळ सुमारे ५० टक्केच अर्ज प्राप्त झाले असून यंदा भावी शिक्षकांनी टीईटी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी सिंधुदुर्गसह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता.
गतवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. गतवर्षी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षक पदाची भरती न करता पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा बिगुल फुंकला आहे.
यंदा गतवर्षीप्रमाणे टीईटी परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा यावर्षी १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे.
गतवर्षी टीईटी परीक्षेसाठी केवळ जिल्हास्तरावरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा होती. मात्र, यावर्षी प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात आठही तालुकास्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून ३० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्हाभरातून या टीईटी परीक्षेसाठी २ हजार २५८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
गतवर्षी केवळ १६५ डी. एड्., बी. एड्. धारक उत्तीर्ण
गतवर्षी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी डी. एड्., बी. एड्. धारकांपैकी ४३७५ टीईटीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ हजार ९७८ अर्जदारांनी परीक्षा दिली होती. टीईटी परीक्षा त्यावर्षी कठीण गेल्याने केवळ १६५ डी. एड्., बी. एड्. धारक पास झाले होते. त्यामुळे यावर्षी संबंधितांनी या परीक्षेकडे कमालीची पाठ फिरविलेली दिसून येत आहे.
१६५ टीईटीधारक नोकरीच्या प्रतीक्षेत
गतवर्षी टीईटी परीक्षा पास झालेल्या जिल्ह्यातील १६५ भावी शिक्षकांना अद्यापही शासनाकडून नोकरी मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. टीईटी पास झालेले प्रमाणपत्र हे ७ वर्षे ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी या पास झालेल्या टीईटीधारकांनी केली आहे.
गतवर्षी सव्वा दोन लाख खर्च
टीईटी परीक्षेच्या नियोजनासाठी शासनाकडून गतवर्षी २ लाख २१ हजार ७० रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता. यावर्षीही शासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Text to TET exams of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.