कचरा करटेलमध्येही टाकण्यास नकार?
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T23:21:30+5:302015-11-04T00:08:25+5:30
खेड नगर पालिका : घनकचऱ्याचा प्रश्न अद्याप प्रलंबितच, प्रत्येक गावाकडून विरोधाचा सूर

कचरा करटेलमध्येही टाकण्यास नकार?
खेड : शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून याकरिता भरपूर प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात तर धामणी, सुकिवली, दस्तुरी आणि करटेल गावातील मोकळ्या जागेबाबत संबंधितांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, या गावांतून प्रखर विरोध करण्यात आला. अखेर प्रखर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधीत करटेल गावामध्ये हा कचरा टाकण्याचे ठरवण्यात आले. मात्र, ६ महिने उलटून गेल्यानंतरही करटेल गावात कचरा डेपो होऊ शकला नाही.
याबाबत माहिती घेतली असता आता करटेल गावातील लोकही या डेपोला विरोध करीत असून, नगरपालिकेला संमती देणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास नगरपालिकेची डोकेदुखी वाढणार असल्याने खेड शहरातील कचरा डेपोचा प्रश्न चांगलाच चिघळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरपालिकेच्या बैठकीत शहरातील घनकचरा डेपोबाबतचा प्रश्न लवकरच सुटेल, अशी आशा पल्लवीत झाली होती. गेल्या काही वर्षांपासून कचरा डेपोबाबत चर्चा आणि पुनर्विचार यापलिकडे नगरपालिकेची गाडी गेलेली नाही. मात्र, मनसेच्या विश्वास मुधोळे यांनी आत्मदहनाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना जाग आली आणि निर्धारित चर्चेच्या अनुषंगाने मे महिन्यात नगरपालिकेच्या दालनात नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीीत करटेल गावातील मोकळ्या जागेचा विचार अंतिम टप्प्यात आला.
ही जागा पालिकेच्या ताब्यात येईपर्यंत रिकाम्या असलेल्या जांभ्या खाणीमध्ये हा कचरा टाकण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मे महिन्यात झालेल्या या बैठकीला मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी़ राधाकृष्णन बी., प्रांताधिकारी जयकृष्ण फड, जयंत जावडेकर, शिवसेनेचे संजय मोदी, नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, उपनगराध्यक्ष वैभव नारायण खेडेकर आणि मनसेचे विश्वास मुधोळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कचऱ्याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. मोबदला देऊनही कचरा डेपोस जागा द्यायला कोणीही तयार नसल्याचे नगरपालिकेने त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तात्पुरत्या स्वरूपात शहरात समर्थनगर परिसरात हा कचरा टाकण्यात येत होता. तेथील लोकांनीही जोरदार विरोध केल्याने नगरपालिकेला माघार घ्यावी लागली. अखेर जगबुडी नदीकिनारी हा कचरा टाकण्यात येत होता. या कचऱ्यामुळे किनारी भागातील लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. या कचऱ्याबाबत लोकांनी मोर्चेही काढले. अखेर सत्ताधारी मनसेचे कार्यकर्ते कंटाळले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते आत्मदहन करण्याच्या तयारीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी खेड पालिकेच्या दालनात याबाबत चर्चा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार खेडमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी तालुक्यातील धामणी, सुकिवली, करटेल आणि भोस्ते या गावातून या प्रकल्पाला जागा देण्याबाबत तीव्र विरोध झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच करटेल गावात आता मानवी वस्तीपासून २ किमी अंतरावर ५ एकर जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.
याठिकाणीही ग्रामस्थांचा विरोध झाल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदशीर मार्गाने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे संकेतही यावेळी त्यांनी दिले. मात्र, तोपर्यंत शहरातील घनकचरा तात्पुरत्या स्वरूपात तालुक्यातील रिकाम्या असलेल्या जांभा दगडाच्या खाणीत टाकण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, ६ महिने उलटल्यानंतरही करटेल गावातील या कचरा डेपोला मुहूर्त मिळत नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
प्रश्न सुटेना...
खेडमधील कचरा आमच्या गावात का? असा सवाल या दोन्ही गावांनी केला आहे. त्यामुळेच या गावांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. खेड नगर परिषदेची गोची झाली असून, पालिकेच्या ताब्यात अशी कोणतीही जागा नसल्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावणार कशी? असा प्रश्न नगर परिषदेसमोर उभा ठाकला
आहे.