स्थानिक नेतृत्वाची क्षमता ठरणार
By Admin | Updated: November 1, 2015 00:06 IST2015-10-31T23:21:29+5:302015-11-01T00:06:23+5:30
काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणास

स्थानिक नेतृत्वाची क्षमता ठरणार
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणास लागली आहे. चारही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाची क्षमता या निवडणुकीद्वारे तपासली जाणार आहे. चर्चेतील राजकारण्यांचे आप्त या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने नगरपंचायतीच्या निवडणुकीला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी निवडणूक काळात येथे ठोकलेला तळ आणि शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीने काँग्रेसवर केलेले दहशतवादाचे तर काँग्रेसने शिवसेना आणि भाजपवर केलेल्या फसवेगिरीच्या आरोपांमुळे निवडणूक चर्चिली गेली आहे.
नगरपंचायतीच्या १७ पैकी ४ प्रभागातील निवडी बिनविरोध झाल्या त्यामध्ये काँग्रेस २, भाजप आणि विकास आघाडीच्या एकेका उमेदवारचा समावेश आहे. उर्वरित १२ प्रभागात काँग्रेसने तर शिवसेना भाजप आरपीआय महायुतीने १२ उमेदवार दिले आहेत. तर प्रभाग १७ मध्ये पक्ष विरहित दुरंगी लढत होत आहे. सद्यस्थितीत काँग्रेस प्लसमध्ये आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १३ प्रभागातून काँग्रेसला किमान ७ तर महायुतीला ८ नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत.
आमदार नीतेश राणे यांनी वैभववाडीत ठाण मांडून बारकाईने निवडणुकीवर लक्ष केंद्र्रित केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही झटून जबाबदारीने काम केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक आहे. जयेंद्र्र रावराणेंनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत परतल्यानंतरची ही पहिलीच आणि त्यातही चिरंजीवाचे राजकीय भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. तर कुशल संघटक आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असलेल्या प्रमोद रावराणेंनी या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून दिले तर भविष्यात पक्ष जिल्ह्याची धुरा त्यांच्या हाती सोपवू शकतो. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी नेत्यांची पाठ
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना वैभववाडीचे तोंड पाहिले. त्यानंतर माजी उपसरपंच तथा जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांच्या पाठबळावर राष्ट्रवादीची धुरा एकहाती सांभाळली आहे. राष्ट्रवादीच्या यश अपयशाचे धनी हेच असणार आहेत.