राष्ट्रवादी,मनसेला आत्मपरीक्षणाची गरज
By Admin | Updated: October 23, 2014 00:04 IST2014-10-22T22:49:41+5:302014-10-23T00:04:01+5:30
दोन्ही पक्षांची धुळधाण : सक्षम नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्ते असूनही मते नाहीत

राष्ट्रवादी,मनसेला आत्मपरीक्षणाची गरज
महेश सरनाईक - कणकवली -गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत यावेळची निवडणूक सर्वाथाने वेगळीच ठरली. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत वेगवेगळे होऊन स्वतंत्ररित्या लढला. त्यामुळे प्रत्येकालाच कोण किती पाण्यात आहे? कोणाची किती ताकद आहे ? हे स्पष्ट करणारी ही निवडणूक होती. तसे पाहिल्यास प्रत्येकाचीच प्रतिष्ठा यानिमित्ताने पणास लागली होती. सिंधुुदुर्गातील राजकारण मात्र, पक्ष केंद्रीत न राहता व्यक्तीकेंद्रीत राहिले. त्यामुळेच की काय राष्ट्रवादी आणि मनसे या दोन पक्षांना सिंधुदुर्गात आपले अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. तर राज्यात भाजपाचे पूर्ण सरकार येवूनही आणि सिंधुदुर्गात प्रचाराला मोदींसारखे स्टार प्रचारक आणूनदेखील भाजपा तृतीय क्रमांकावर फेकला गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण हे गेल्या काही वर्षात व्यक्तीकेंद्रीत राहिले आहे. १९९0 पासून नारायण राणेंच्या भोवती फिरत राहिलेले हे राजकारण आता २0१४ सालात बदलले आहे. ते आता पुढे कोणा एकाभोवती राहणार की पक्षकेंद्रीत होणार ते काही वर्षात स्पष्ट होईल.
नारायण राणे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंगच बांधला होता. त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक पक्षातील काही नेत्यांचाही छुपा पाठींबा होता. त्यात राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेसअंतर्गत एका गटाचा समावेश होता. त्यामुळे राणे यांचा पराभव करून या सर्व लोकांनी आपल्याला हवे असलेले इप्सित साध्य केले. मात्र, त्यातून आता पुढे काय साधणार ? याचे दुरोगामी काय परिणाम होणार याबाबत आताच वाच्यता करणे कठीण आहे. परंतु काहीही असो नारायण राणे यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि राज्यभरात धडाकेबाज कोकणी नेतृत्व येथील जनतेने गमावले आहे.
दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण हे पक्षकेंद्रीत राहिले नसल्याने आगामी काळात जर असेच प्रत्येकवेळी सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढत राहिले तर त्याचा फायदा आता व्यक्तीकेंद्रीत राजकारण करणाऱ्यांना बसणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन आमदार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचा एक. परंतु भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेच्या मतांची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. भाजपाला त्यांच्याकडे असलेली कणकवलीची पारंपारिक जागा राखता आली नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कणकवलीत कासार्डे येथे सभा घेवून गेले. मात्र, १९९0 सालच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आमदार प्रमोद जठार यांचा पराभव झाला.
दुसरीकडे गतनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे सावंतवाडीची एक जागा आमदार दीपक केसरकर यांच्या रूपाने होती. मात्र, आमदार केसरकर यांनी निवडणुकीच्या एक महिना अगोदरच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीने याठिकाणी दोडामार्गमधील राष्ट्रवादीचे नेते आणि दीपक केसरकर यांच्याबरोबरीने शिवबंधन बांधलेल्या सुरेश दळवींना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश देवून आमदारकीसाठी दीपक केसरकर यांच्या विरोधात रिंगणात उतरविले. मात्र, या ठिकाणी दीपक केसरकर यांनी एकहाती किल्ला लढवत आपणच सावंतवाडी विभागाचा किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीने सन २00९ मधील जिल्ह्यातील आपली कणकवली आणि सावंतवाडीची असलेली एक-एक जागा गमाविली. तर काँग्रेसने मात्र, सन २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच पुन्हा जिल्ह्यात एक जागा कायम ठेवली. काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे सन २00९ मधील ती जागा काँग्रेसने गमावली. मात्र, त्या बदल्यात कणकवलीची जागा त्यांनी कमावल्याने त्यांचा आकडा पुन्हा जैसे थे झाला आहे. मनसेचा विचार करता मनसेने सन २00९ मधील निवडणूकच लढविली नव्हती. परंतु आता पहिल्यांदाच निवडणूक लढविली. परंतु त्यांना अपेक्षित यशही मिळालेले दिसत नाही. त्यांचा जरी पराभव झाला असला तरी सावंतवाडी मतदार संघात परशुराम उपरकर यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सावंतवाडीत सभाही झाली होती. मात्र, असे असले तरी उपरकर हे या मतदार संघात आपले डिपॉझीटही वाचवू शकले नाही. मनसेला राज्यभरातच मोठा दणका बसला असल्यामुळे सध्या या विषयावर कोण चर्चाही करणार नाही. मात्र, एकंदरीत ही निवडणूक राष्ट्रवादी आणि मनसेसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांना अशी मत प्राप्त झाली.
काँग्रेस
१.६० लाख
काँग्रेसला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १६०२९७ मते मिळाली. सर्वाधिक मते कणकवली मतदारसंघात पडली.
शिवसेना
१.५४ लाख
शिवसेनेला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १५४३४७ मते मिळाली. सर्वाधिक मते सावंतवाडी मतदारसंघात पडली.
भाजपा
८३ हजार
भाजपाला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ८३२६५ मते मिळाली. सर्वाधिक मते कणकवली मतदारसंघात पडली.
राष्ट्रवादी
१९ हजार
राष्ट्रवादीला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १९९१७ मते मिळाली. सर्वाधिक मते सावंतवाडी मतदारसंघात पडली.
मनसे
६ हजार
मनसेला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ६१२९ मते मिळाली. सर्वाधिक मते सावंतवाडी मतदारसंघात पडली.