महामार्ग चौपदरीकरण मोबदला वाटप प्रक्रियेस सुरू वात

By Admin | Updated: March 3, 2017 23:48 IST2017-03-03T23:48:03+5:302017-03-03T23:48:03+5:30

या दोन तालुक्यांतील मिळून २० हजार मोबदलाप्राप्त खातेदार आहेत.

The highway started the process of reimbursement for four-fold compensation | महामार्ग चौपदरीकरण मोबदला वाटप प्रक्रियेस सुरू वात

महामार्ग चौपदरीकरण मोबदला वाटप प्रक्रियेस सुरू वात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील २९ गावांचा निवाडा जाहीर झाला असून, या गावांसाठी मोबदल्याची ३८१ कोटी इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. आता या रकमेच्या वाटपाची प्रक्रिया येथील प्रांत कार्यालयाकडून सुरू झाली आहे. ही भरपाई संबंधितांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी तालुक्यातील १२ आणि संगमेश्वर तालुक्यातील २२ अशा एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी रत्नागिरीतील चार आणि संगमेश्वरमधील सहा अशा एकूण दहा गावांचा निवाडा पहिल्या टप्प्यात, तर १९ गावांचा निवाडा दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आला. निवाडा जाहीर झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील आठ आणि संगमेश्वर तालुक्यातील २१ गावांसाठी शासनाकडून भरपाई म्हणून ३८१ कोटी रुपये नुकतेच प्राप्त झालेआहेत. यापैकी २०३ कोटी रुपये रत्नागिरी तालुक्यासाठी, तर १७८ कोटी रुपये संगमेश्वर तालुक्यासाठी आहेत. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मोबदला वाटप प्रक्रिया झाली नाही. मात्र, आता निवडणुका संपल्याने वाटपाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या दोन तालुक्यांतील मिळून २० हजार मोबदलाप्राप्त खातेदार आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रनिहाय भरपाईची रक्कम कळवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या-त्या गावांमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी जावून लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक गोळा करणार आहेत. त्यानंतर त्या खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी निवाडा प्रक्रिया पूर्ण झालेल्या २९ गावांना आता मोबदला वाटप करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, चरवेली, कोठारेवाडी या चार गावांचा तसेच संगमेश्वरमधील निढळेवाडी अशा एकूण ५ गावांचा निवाडा तांत्रिक अडचणींमुळे तसेच ग्रामस्थांच्या हरकतींमुळे अद्याप झालेला नाही. (प्रतिनिधी)

निढळेवाडीचे लवकर सर्वेक्षण
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली, कोठारवाडी, पाली, पाली बाजारपेठ या चार गावांमधील ग्रामस्थांच्या हरकतींमुळे या गावांचा अद्याप निवाडा झालेला नाही. काही निकषांमध्ये बदल झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडीचे सर्वेक्षण पुन्हा करण्यात येणार आहे.



रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील गावेझरेवाडी, नागलेवाडी, मराठेवाडी, तारवेवाडी, निवळी - रावणंगवाडी, हातखंबा, खानू.
मानसकोंड, तळे, कोळंबे, कोंडआंबेड, ओझरखोल, आंबेडबुद्रुक, आरवली, हरेकरवाडी, तुरळ, गोळवली, धामणी, आंबेडखुर्द, कसबा-संगमेश्वर, रामपेठ, वाडा नावडी, माभळे, कुरधुंडाखुर्द, कुरधुंडा, सोनगिरी, वांद्री, कांटे.
निवडणुकीमुळे काम रखडले
रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमध्ये सुमारे २० हजार खातेदार आहेत. आॅगस्टमध्ये २९ गावांचे निवाडे जाहीर झाल्यानंतर पाच महिन्यानंतर जानेवारीमध्ये मोबदला रक्कम प्राप्त झाली. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कालावधीत आल्याने मोबदला वाटपाचे काम प्रांत कार्यालयाला हाती घेता आले नव्हते.

Web Title: The highway started the process of reimbursement for four-fold compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.