सिंधुदुर्ग गुंडगिरीमुक्त करण्यासाठी सत्ता द्या
By Admin | Updated: October 30, 2015 23:25 IST2015-10-30T22:55:53+5:302015-10-30T23:25:13+5:30
विनोद तावडे : सत्तेच्या माध्यमातून वैभववाडी, दोडामार्ग विकसित करु

सिंधुदुर्ग गुंडगिरीमुक्त करण्यासाठी सत्ता द्या
वैभववाडी : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती जुटली आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग दादागिरी व गुंडगिरीमुक्त बनविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. आम्ही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून दोन्ही शहरे विकसित करुन दाखवू, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शिक्षणमंत्री तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे, अशोक रावराणे, सदा ओगले, राजन चिके, सुहास सावंत, संजय रावराणे आदी उपस्थित होते.तावडे पुढे म्हणाले, वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीची पहिली सत्ता चांगल्या लोकांच्या हातात मिळाली तरच शहरांच्या विकासाची पट्टी नीट चालेल. सुरुवातीलाच गडबड झाली तर मात्र ही चूक लवकर दुरूस्त होणार नाही याची दक्षता मतदारांनी घ्यावी. कारण पालकमंत्री युतीचे, राज्य आणि केंद्रात सत्ताही युतीचीच आहे. जनतेचे प्रश्न सत्तेशीच निगडीत असतात. त्यामुळे सत्तेतील माणसे निवडून दिली तर जनतेचे प्रश्न भराभर सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना, भाजप, आरपीआयच्या हातात सत्ता द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले.काँग्रेसने सत्तेत असताना किती घरातील तरुणांना नोकरी दिली. येथील जनतेने भाच्यावर विश्वास दाखवत नगरपंचायतीची सत्ता आमच्या हाती द्यावी, आम्ही प्रत्येक घरात रोजगार देऊ. जिल्'ाचे पालकमंत्री केसरकर आहेत. तरीही वैभववाडीचा अतिरिक्त पालकमंत्री म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी मी स्विकारत आहे. काँग्रेस १५ वर्षात जे करू शकली नाही ते आम्ही एक वर्षात करुन दाखवलंय. त्यामुळे युतीवर विश्वास दाखवून आजोळच्या विकासाची भाच्याला संधी द्यावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
राणेंचा विकास थांबला : केसरकर
सिंधुदुर्गच्या विकासाला वर्षभरात गती आली आहे. सत्ता गेल्यामुळे नारायण राणेंचे जमिनींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच त्यांना विकास थांबल्याचा भास होतोय अशी खिल्ली उडवत राणेंच्या ताटाखालचे मांजर असणारे अधिकारी बदलल्यामुळे जिल्ह्यात सक्षम प्रशासन आले आहे. त्यामुळे विकास झपाट्याने सुरु आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमुळे वैभववाडी बदनाम : तावडे
वैभववाडीचा मतदार विकला जातो, अशी काँग्रेसने सर्वत्र बदनामी केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी इथला मतदार विकला जात नाही, तर तो भावी पिढीच्या भवितव्यासाठी मतदान करतो हे दाखवून द्यावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे वैभववाडीवासीयांना केले आहे.