उमेदवारांचा लागतोय कस
By Admin | Updated: January 4, 2015 01:01 IST2015-01-04T01:00:30+5:302015-01-04T01:01:33+5:30
वेंगुर्ले नगरपरिषद पोटनिवडणूक : सहा जागांसाठी एकवीस जण रिंगणात

उमेदवारांचा लागतोय कस
सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपा, राष्ट्रीय काँग्रे्रस व राष्ट्रवादी यांच्यातच तिहेरी लढत संभाव्य असली, तरी काही प्रभागामध्ये अपक्षांची ‘काँटे की टक्कर’ असणार, हे निश्चित. मात्र, डिसेंबर २०११ च्या निवडणुकीत एका पक्षात तर या निवडणुकीत दुसऱ्याच पक्षातून, तसेच काही पराभूत उमेदवार परत नशीब आजमावताना दिसत आहेत. नगरपरिषदेच्या स्थिर प्रशासनासाठी व शहराची विकासकामांची गती वाढविण्यासाठी या निवडणुकीत मतदारसंघाची कसोटी लागणार आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेची निवडणूक २२ डिसेंबर २०१२ रोजी झाली. त्यावेळी राड्याचे प्रकरण काँग्रेसला भोवले व वेंगुर्लेवासीयांनी तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. यावेळी नम्रता कुबल नगराध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीला साथ देणारे अपक्ष रमण वायंगणकर उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, त्यांचा कार्यकाल संपताच ९ जुलै २०१३ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतच नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीवरून दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले. यात पूजा कर्पे नगराध्यक्षपदी, तर गटनेते वामन कांबळी उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर व्हीप डावलण्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा केला. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी त्यावेळी १२ नगरसेवकांना अपात्र ठरविले.
मात्र, उच्च न्यायालयात स्टेविषयी धाव घेतली होती. न्यायालयाने सात नगरसेवकांचे निलंबन केले. याच सात जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र, प्रभाग क्र. ४ मधील एका जागेसाठीचे दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक सहा जागांसाठी होणार आहे.
सध्या परिषदेत भाजपचे दोन नगरसेवक आहेत. परंतु भाजपा सेनेच्या मदतीने युती झालेली असल्याने राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता व नरेंद्र मोदी तसेच देवेंंद्र फडणवीस यांचा प्रभाव शहरातील मतदारांवर कायम राहिल्यास सेना-भाजप युती वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सत्तेत येऊ शकते. तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल हे मात्र आपले बहुमत राखण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीच्या मदतीने ‘एकला चलो’ची भूमिका त्यांच्या कितपत पथ्यावर पडते व मतदार संधी देतील का? याबाबत मतदार राजा भविष्य ठरविणार आहे.
तिरंगी लढतीने चुरस वाढली
सात जागांसाठी काँग्रेस ६ व राष्ट्रवादी ५ स्वबळावर लढणार असून शिवसेना-भाजपाची युती असणार आहे. यामध्ये शिवसेना चार प्रभागात, तर भाजपा तीन प्रभागात निवडणूक लढविणार आहे. तर तीन जागा अपक्ष उमेदवार लढणार आहेत. त्यामुळे काही प्रभागात अडसर ठरणार आहे. ५/१२ चा प्रभाव पालिके च्या या निवडणुकीत दिसल्यास काँग्रेसला अधिक नगरसेवक विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे सेना-भाजप व राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे. मात्र, काही प्रभागात अपक्षांचेही वर्चस्व आहे.