स्थानिकांच्या जमिनीवर परप्रांतियांचे अतिक्रमण
By Admin | Updated: August 17, 2014 22:34 IST2014-08-17T21:58:54+5:302014-08-17T22:34:34+5:30
ओटवणेतील स्थिती : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

स्थानिकांच्या जमिनीवर परप्रांतियांचे अतिक्रमण
महेश चव्हाण -ओटवणे -ओटवणे दशक्रोशीतील केरळीयन तसेच अन्य परप्रांतियांचे अतिक्रमणासह विविध प्रताप वाढू लागले आहेत. या परप्रांतियांनी येथील सुपीक व जंगल परिसरातील जमिनीवर अतिक्रमण करून जमिनी तर हडप केल्याच आहेत, पण आता स्थानिकांना त्रास देऊन दमदाटी करू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओटवणे दशक्रोशीतील ओटवणे, भालावल, विलवडे, सरमळे, दाभिल, नांगरतास, नेवती, कोनशी, घारपी, तांबोळी, असनिये या पट्ट्यातील डोंगराळ जमिनी केरळीयन परप्रांतियांनी हस्तगत केल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांना पैशाचे आमिष दाखवून या जमिनीवर त्यांना कब्जा मिळविण्यात यश आले आहे. या भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचा पट्टाच परप्रांतियांनी गिळंकृत केला आहे. शेती- फळबागायती वसविण्याच्या उद्देशाने आलेल्या परप्रांतियांचा दबदबा आता स्थानिक वस्तीत दिसू लागला आहे. दोडामार्ग तालुक्यात या परप्रांतियांंकडून भयानक घटना घडल्या आहेत. मनुष्यवधासह स्त्रियांवरील अत्याचारासारखी काळीमा फासणारी नीच कृत्ये परप्रांतियांनी केली आहेत. तशीच काहीशी कृत्ये सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे दशक्रोशीतील स्थायिक परप्रांतियांकडून केली जात आहेत. घारपी येथे नुकत्याच झालेल्या घटनेने याठिकाणी खळबळ उडवून दिली. घारपी येथे महिलेचा परप्रांतियांकडून विनयभंगाचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परप्रांतीय या भागात घुसल्यापासून येथील नैसर्गिक साधन संपत्तीवरही हक्क सांगू लागले आहेत. शेती-फळ बागायती उभारण्याच्या उद्देशाने येथील डोंगररांगा भुईसपाट केल्या आहेत. वर्षानुवर्षांची झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. वृक्षतोडीची बंदी असतानाही या परप्रांतियांना शासनाची परवानगी मिळते तरी कशी? याबाबत ग्रामस्थांच्या मनात साशंकता आहे.
एरवी सामान्य माणसाला स्वत:च्या मालकीच्या झाडांची तोड करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी वनविभागाकडे येरझाऱ्या घालाव्या लागतात. मग खुलेआम वृक्षतोड करणाऱ्या, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा उजाड करणाऱ्या या परप्रांतियांना निर्बंध का लादले जात नाहीत? धनदांडग्या या परप्रांतियांकडून शासनाच्या कर्मचाऱ्यांना गप्पगार केले जाते. येथील जमिनीसह बारमाही वाहणाऱ्या नदीवर तर यांनी अधिराज्य गाजविले आहे. ओटवणे गड नदी व दाभिल नदी, जी पुढे तेरेखोलला जाऊन मिळते, या नदीवर मोठे हॉर्स पॉवर पंप बसवून उन्हाळ्याच्या दिवसात बेसुमार पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळी दिवसात स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या तसेच शेतीसाठी पाण्याचा तुटवडा जाणवतो.
या भागात शेती-बागायती करून व्यवसाय करण्यापर्यंत गोष्ट ठीक होती. पण या परप्रांतियांकडून स्थानिकांवर दादागिरी केली जाते. स्त्रियांवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले जातात. ओटवणे दशक्र ोशीत आता या घटनांना ऊत येऊ लागला आहे. या परप्रांतियांची नोंद व्हावी व त्यांच्यावर निर्बंध लादले जावेत. अन्यथा येथील गाव परप्रांतियांच्या दहशतीने ग्रासले जातील. ओटवणे पंचक्रोशीत प्रथम एक ते दोन व्यावसायिकांनी केळीची बागायती थाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालांतराने याची संख्या वाढत असून केळीची जागा प्लांटेशन, अननस आदी उत्पादक फळांनी घेतली आहे. आता जवळ जवळ ५० ते ७० व्यावसायिकांनी येथे पाय रोवले असून त्यामुळे भविष्यात या परप्रांतियांच्या पारतंत्र्यात येथील स्थानिक जगणार आहेत की काय, अशीच भीती निर्माण झाली आहे.
माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
परप्रांतियांनी व्यवसाय थाटण्याच्या उद्देशाने येथील डोंगर रांगांवरील वृक्ष भुईसपाट करून मातीचे जेसीबीद्वारे उत्खनन केले आहे. त्यामुळे हादरलेल्या सह्याद्री डोंगररांगाखालील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. माळीण गावाच्या उद्ध्वस्तेची घटना ताजी असताना अशा डोंगर पट्ट्याविषयी शासन का पाऊल उचलत नाही? या डोंगररांगांचा सर्व्हे होणेही गरजेचे आहे. की जीवितहानी झाल्यानंतरच शासनाला जाग येणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घारपी येथे झालेल्या घटनेने येथील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धनदांडग्या परप्रांतियांसमोर शासन, पोलीस रक्षक नमते घेत असल्याने त्यांची लगेच जामिनावर मुक्त्तता होते. पण हे विषय काही थांबत नाहीत. याबाबत तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन आक्रमक आंदोलन केले जाईल. या परप्रांतियांवर कायमचे निर्बंध घालावेत.
- दीपक गावडे, घारपी