आंबोली ग्रामस्थांनी अवजड वाहने अडविली, प्रशासनाच्या कारभारावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 16:46 IST2019-04-27T16:45:02+5:302019-04-27T16:46:50+5:30
आंबोली घाटीतून अवजड वाहतूक बंद असतानाही या मार्गावरून मायनिंगची वाहतूक करणारी पाच अवजड वाहने शुक्रवारी सायंकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवून त्यांना परत पाठविले. अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील चाळीस फुटांची मोरी कोसळण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात्र निद्र्रिस्त असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आंबोली घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत यांना दिले. यावेळी विलास गावडे, मोहन चव्हाण, विशाल बांदेकर, आदी उपस्थित होते.
आंबोली : आंबोली घाटीतून अवजड वाहतूक बंद असतानाही या मार्गावरून मायनिंगची वाहतूक करणारी पाच अवजड वाहने शुक्रवारी सायंकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवून त्यांना परत पाठविले. अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील चाळीस फुटांची मोरी कोसळण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात्र निद्र्रिस्त असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अवजड वाहतुकीला बंदी असतानाही ही वाहने घाट चढून वर कशी येतात? असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. आंबोली पोलिसांना याबाबत वारंवार सूचना करूनही पोलिसांनी योग्य तो पाठपुरावा केला नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. आंबोली घाटीतील चाळीस फुटांची मोरी एका बाजूने खचली असून, ती येत्या काही दिवसांत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. असे असताना प्रशासन याबाबत गांभीर्याने भूमिका घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप दिसून आला.
दरम्यान, प्रशासनाला गांभीर्य नसेल तर आता ग्रामस्थच रस्त्यावर उतरून उद्यापासून सर्वच वाहने परत पाठविण्यात येतील, असा इशारा आंबोली ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला. यावेळी आंबोली उपसरपंच विलास गावडे, पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण, रुपेश गावडे, अजित गावडे, विशाल बांदेकर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी
दरम्यान, येथील पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांची भेट घेऊन प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत यांना देण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिसांना सूचना केल्या असतानाही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.