अळंबी प्रकल्पांना मदतीची गरज-युवा उद्योजकांचे लॉकडाऊनच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:06 PM2020-06-01T16:06:29+5:302020-06-01T16:07:00+5:30
सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी शासनाकडे केली आहे.
बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -फणसवाडी येथील युवा उद्योजक योगेश कृष्णा देसाई यांनी नोकरीच्या मागे न लागता अळंबी शेती गावात सुरू केली आहे. योेगेश हे उच्चशिक्षित आहेत. मुंबईतील धकाधकीच्या जीवनाला कंटाळून आपली नोकरी सोडून ते गेली ४ ते ५ वर्षे गावात अळंबी व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात अनेक चढउतार त्यांनी पाहिले. व्यवसायात त्यांचा जम बसला होता. पण गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यान अळंबीचा तयार माल जाग्यावरच खराब झाला. यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे. देसाई यांचे मोठे नुकसान झाले.
सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी शासनाकडे केली आहे.
सध्या सिंधुदुर्गात दहाहून अधिक उद्योजक अळंबी शेती करतात. लॉकडाऊनच्या काळात माल तयार असूनही तो जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गात सध्या १० अळंबी प्रकल्प उभे आहेत. त्यात सरासरी महिन्याकाठी एकूण ३ ते ३.५ टन मशरुम (अळंबी)चे उत्पादन होते. यातून महिन्याची एकूण अंदाजे उलाढाल ९ ते १० लाखांच्या आसपास होती. सर्व अळंबीची स्थानिक बाजारपेठेतील हॉटेल तसेच शेजारच्या गोवा राज्यातील बाजारपेठ येथे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.
पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. सर्व हॉटेल, सुपर मार्केट हे बंद असल्यामुळे युवा उद्योजकांना अळंबी व्यवसाय बंद करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या काळात या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तरुणांना न्याय द्यावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. मात्र, जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांना राज्यशासनाने काही प्रमाणात अर्थसहाय्य केले तर अळंबी (मशरूम) व्यावसायीक लॉकडाऊनंतर पुन्हा नव्या जिद्दीने हा व्यवसाय सुरू करू शकतील. याशिवाय कोकणातील सुशिक्षित तरुणांना पुन्हा योग्य ती दिशा मिळेल. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर लोकांनाही नवीन रोजगार मिळू शकेल. तरी शासन व प्रशासनाने या व्यवसायाला चालना देऊन होतकरू तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी युवा उद्योजक योगेश देसाई यांनी केली आहे.
लॉकडाऊन काळात डेगवे येथे अळंबी माल जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत.