रत्नागिरी/कणकवली : उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी या प्रकरणाचा जबाब नोंदवण्यासाठी वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक रत्नागिरीत हजर झाले होते. तब्बल साडेसहा तास ही चौकशी सुरू होती. याप्रकरणी आता उघड चौकशीअंतर्गत त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. कणकवली येथून वैभव नाईक सपत्नीक सकाळी रत्नागिरी येथे रवाना झाले होते. दुपारी १२ वाजता ते साडेसहा त्यांची चौकशी व जबाब सुरू होता.गेल्या दोन वर्षांत आपण तीन वेळा चौकशीला हजर राहिलो आहाेत. मी आणि माझ्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत, आम्ही खरेदी केलेल्या जागा याची माहिती मागितली गेली. आपण ती विहीत नमुन्यामध्ये सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रावर आवश्यक असलेली माहिती तशा पद्धतीने दिली आहे. चौकशीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आवश्यक ते सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहू, असे ते म्हणाले.
कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीआजपर्यंत झालेल्या चौकशीत आपण पुरेशी माहिती सादर केली आहे. पण, कदाचित राजकीय दबाव असेल किंवा काही अधिक माहिती हवी असेल म्हणून ही चौकशी लावण्यात आली असावी, असे ते म्हणाले. हा दबाव शिंदेसेनेत किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी आहे का, असा प्रश्न करण्यात आला असता, आपण उद्धवसेनेतच राहणार असून, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.