झेडपीचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच
By Admin | Updated: July 27, 2014 00:19 IST2014-07-27T00:16:26+5:302014-07-27T00:19:29+5:30
जी. श्रीकांत : लोकाभिमुख प्रशासनावर भर

झेडपीचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच
सातारा : ‘मी ही कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार असून, लोकाभिमुख प्रशासनावर जास्तीत जास्त भर देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
येथील जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी बातचित केली. ते म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अधिकारी म्हणून मी येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्'ात माझी नियुक्ती झाली आहे. ऐतिहासिक साताऱ्यात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. सातारा जिल्हा परिषद ही राज्यात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेला चांगली परंपरा आहे. ती कायम जपण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य यांना बरोबर घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वस्तरातील लोकापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ई लर्निंगवर अधिक भर देणार आहे.
सध्या पाणी हा प्रश्न केंद्रबिंदू झाला आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळायला हवे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. शहरातील सुविधा ग्रामीण भागातही मिळायला हव्यात. त्यासाठी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. तेथील समस्या जाणून घेणार आहे. दुष्काळ असणाऱ्या ठिकाणी विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)