काम कर्मचाऱ्यांचं; ऐट अधिकारी, पदाधिकाऱ्यांची! कऱ्हाड पंचायत समितीतील कारभार
By Admin | Updated: June 17, 2016 00:48 IST2016-06-16T22:02:00+5:302016-06-17T00:48:06+5:30
कक्षाच्या दिखाऊपणासाठी बक्षिसाची लाखोंची रक्कम खर्च; कर्मचाऱ्यांच्या नशिबी मात्र

काम कर्मचाऱ्यांचं; ऐट अधिकारी, पदाधिकाऱ्यांची! कऱ्हाड पंचायत समितीतील कारभार
काम कर्मचाऱ्यांचं; ऐट अधिकारी, पदाधिकाऱ्यांची!
कऱ्हाड पंचायत समितीतील कारभार : कक्षाच्या दिखाऊपणासाठी बक्षिसाची लाखोंची रक्कम खर्च; कर्मचाऱ्यांच्या नशिबी मात्र मोडक्या खुर्च्या अन् तुटलेली कपाटं
कऱ्हाड : येथील पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियानामध्ये विभागात व राज्यात नावलौकिक प्राप्त केला. त्यामुळे येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पुरस्कारांची झापड आली असून, ते जणू सैराटच झाले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे हे पुरस्काराचे झिंग झिंग झिंगाट पाहायला मिळते.
मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून पंचायत समितीचे सभागृह, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपली दालने चकाचक केली आहेत. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन हे यश मिळवून दिले. त्यांच्या नशिबी मात्र, मोडक्या खुर्च्या, काचा तुटलेल्या खिडक्या आणि जुनी झालेली कपाटेच आली आहेत. याबद्दल कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कऱ्हाडला नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्व राहिले आहे. साहजिकच येथील पंचायत समितीलाही राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. राज्यात पंचायत राज्य व्यवस्था अस्तित्वात आली.
तेव्हा कऱ्हाड येथेही पंचायत समितीची स्थापना झाली. या पंचायत समिती अंतर्गत कऱ्हाड दक्षिण व उत्तर या दोन मतदार संघातील सुमारे २२२ गावांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत कऱ्हाड पंचायत समितीला वेगळे स्थान आहे. त्यामुळे येथील सभापतींचा तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
कऱ्हाड पंचायत समितीचा कारभार नेहमीच चांगला राखण्याचे काम प्रशासन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समितीने सलग दोन वर्ष या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा विभागीय व राज्य पातळीवर यश संपादन केले.
कऱ्हाड पंचायत समितीला यशवंत पंचायत राज अभियान २०१४-१५ मध्ये पंचायत समितीचा महाराष्ट्र राज्यात द्वितीय तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याची बक्षिसे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात स्वीकारली. त्यातून पंचायत समितीला लाखोंची बक्षिसे मिळाली.
या सगळ्या यशात पंचायत समितीच्या द्वितीय व तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. याचा सोयीस्कर विसर अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पडला आहे. बक्षिसाच्या रक्कमेतून प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांची दालने चकाचक झालेली दिसतात. इमारतीचे बाह्य रूपही पालटले आहे. मासिक बैठका घेण्यासाठी वापरात असलेल्या सभागृहाने कात टाकली आहे.
मात्र, ज्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमताून ही बक्षिसे मिळाली. त्यांच्या विभागात कसलीही सुधारणा केलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर आळवला जात आहे.
पंचायत समितीत ग्रामपंचायत प्रशासन, शेती विभाग याची अवस्था पाहिल्यानंतर हीच का ती पुरस्कार प्राप्त पंचायत समिती, असा प्रश्न उपस्थित होतो.
कक्षांच्या भिंतींना कित्येक वर्षांपासून रंग देण्यात आलेला नाही. वर्षानुवर्षे जुने फर्निचर तशाच अवस्थेत वापरात आहे. अभिलेख कक्षाचा तुटलेला दरवाजा, फुटलेल्या काचांच्या खिडक्या याचीच जणू साक्ष देत आहेत. (प्रतिनिधी)
त्यांनी स्वत:च रंगविला विभाग
पंचायत समितीत शिक्षण विभाग नेहमीच चर्चेचे रंग उधळत असतो. मात्र, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट न पाहता स्वत:च आपला विभाग रंगवून घेतला आहे. आता त्यांनी हा निधी कुठून उभा केला हा संशोधनाचा विषय आहे.
माजी मुख्यमंत्र्यांनी दिला होता घरचा आहेर
काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या नूतनीकरण केलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सभापती देवराज पाटील यांना टोला लगावला. ‘मी मुख्यमंत्री असताना गटातटाच्या राजकारणाचा विचार न करता पंचायत समितीचा नूतन इमारतीचा प्रस्ताव दिला असता तर आज केवळ सभागृहाचे उद्घाटन करण्याऐवजी नूतन अद्ययावत इमारतीचे उद्घाटन केले असते,’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.